प्रतिनिधी / पलूस
पलूस तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना फोनवरून दिल्या आहेत.
पलूस तालुक्यासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यात रविवारी व सोमवारी रात्री वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला. दुधोंडी व ईतर काही गावात सोमवारी गारांसह पाऊस झाला. या वादळी पावसाने पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी ऊस, मका ,फुले, भाजिपाला अशा पीकांचे नुकसान झाले आहे.
नुकत्याच खरड छाटणी होऊन नवीन फुटी आलेल्या द्राक्षबागांतील काड्या मोडून गेल्या आहेत. पाने फाटली आहेत. अगोदरच कोरोनाने गेली दोन वर्षे द्राक्षाला बाजारपेठ न मिळाल्याने द्राक्षबागायतदारांना मोठा आर्थिक तोटा झाला आहे. परत आता वादळी वारा व पावसाने द्राक्षबागायतदारांना फटका बसत आहे.
वादळी वारा आणि पावसाने नुकसान झालेल्या शेतीची व परिस्थितीची माहिती मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी घेतली. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचेशी फोनवरून नुकसानिबाबत चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.