आज जगातील बरीच राष्ट्रे कोविड-19च्या समस्यांविरुद्ध आरोग्य, आर्थिक, सामाजिक स्तरावरती निकराचा लढा देत आहेत. अमेरिका, रशियासारख्या महासत्तांची कोरोना विषाणूच्या संकटाविरुद्ध लढा देताना प्रचंड दमछाक झालेली आहे. आज कोरोना विषाणूने लाखो लोकांना यमसदनी पाठवलेले आहे आणि अजूनही विविध राष्ट्रात हजारो लोक मृत्यूशय्येवरती पडलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मानवी समाजाने केलेली प्रगती तसेच चंद्र, मंगळ आणि अवकाशातील जी असंख्य रहस्ये शोधून काढण्यात घेतलेली उत्तुंग भरारी समोर असताना ज्या रितीने जगातल्या काही राष्ट्रांत कोरोनामुळे माणसे पटापट मरत आहेत ते चिंताजनक आहे. कोरोना हा पशुउद्भव विषाणू माणसांना मृत्यूच्या खाईत लोटण्याबरोबर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्यास कारणीभूत ठरलेला आहे. विषाणू, जीवाणू, परजीवी आणि बुरशीमुळे तऱहेतऱहेचे पशुउद्भव आजार होतात. यातले काही आजार सर्दी, खोकला, तापासारखे तर काही गुंतागुंतीचे होऊन प्राणघातक ठरलेले आहेत. गोचिड, मच्छर, माशांच्या चाव्याने, प्रदूषित अन्न, पाणी यांच्या प्रादुर्भावामुळे आजारांनी जगातल्या काही राष्ट्रांनी असंख्य लोकांना मृत्यूमुखी पाडलेले आहे. विषाणूमुळे उद्भवणाऱया बऱयाच रोगांनी पाच वर्षांची बालके, साठोत्तरीचे वृद्ध, दुर्बल प्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्ती त्याचप्रमाणे गरोदर महिलांचे जगणे संत्रस्त केलेले आहे.
पशु-पक्षी यांच्याशी येणाऱया संपर्कामुळे निष्काळजीपणाने बऱयाच रोगांचा प्रसार वेळोवेळी होऊन मनुष्यजीवन संकटग्रस्त झालेले आहे. रोगग्रस्त प्राण्यांची लाळ, रक्त, लघवी, शौच आणि अन्य द्रव्यांशी होणाऱया संपर्काने तसेच मत्स्यालय, डुक्कर, कुत्रे, कोंबडे यांच्या अधिवासाशी येणाऱया संपर्कामुळे रोगास कारण ठरणाऱया विषाणूंचा मानवी समाजावर गंभीर दुष्परिणाम झालेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मलेरिया, प्लेग, रॅबीज, हेपाटायटीस-ई, ऍन्ध्रकस, बर्ड फ्लू, एशियन फ्लू, स्पॅनिश फ्लू, हाँगकाँग फ्लू, डेंगू, इबोलासारख्या पशुउद्भव आजारांनी जगभरातल्या कोटय़वधी जनतेला मृत्यूमुखी लोटलेले असून अजूनही त्यातल्या काही रोगांचा जहरी विळखा मानवी समाजाला संकटाच्या खाईत लोटत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. कोविड-19ने आज विलक्षण गतीने आपला प्रसार आणि विस्तार केलेला असल्याने या विषाणूमध्ये नित्य उत्परिवर्तन आणि उक्रांती होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. चीनमध्ये जेव्हा कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले तेव्हा त्याचा उद्गम वटवाघळांपासून झाला असावा असे सांगितले जात होते परंतु या संदर्भात शास्त्रज्ञात एकवाक्यता नसून इतके मात्र खरे की हा विषाणू पशुउद्भव आहे. प्रारंभी अमेरिका आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखतील असे मानले जात होते परंतु अमेरिकासारख्या राष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या लक्षणीय झालेली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये. आज मानवी समाजासमोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. कोरोनाग्रस्तांच्या शिंकण्याद्वारे, श्वासामधून किंवा खोकल्यामधून विषाणू हवेत पसरतात व त्याद्वारे रोगाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि त्यासाठी त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जी नियमावली लागू केलेली आहे तिचे पालन करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज जगभर कोरोना विषाणूचा फैलाव ज्या रितीने होत आहे ते पाहिले तर हे संकट लवकरात लवकर दूर होण्याची चिन्हे अस्पष्ट आहेत. सर्वसामान्य लोकांचे रोजगार गेल्याकारणाने आज त्यांचे आर्थिक व्यवहार संकटग्रस्त आहेत. केवळ आपलाच देश नव्हे तर युरोप-अमेरिका खंडातील बरीच राष्ट्रे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. कोणी कल्पनाही केली नव्हती की कोरोनासारख्या विषाणूचा उद्गम होईल आणि हा हा म्हणता त्याच्या प्रादुर्भावाखाली लाखो लोक झपाटय़ाने मृत्यूमुखी पडतील परंतु आज वृद्ध, गरोदर महिला, आजारी व्यक्तिंबरोबर 30-40 वयोगटातील दुर्बल प्रतिकारशक्ती असलेली माणसे पटापट कोरोना विषाणूच्या दुष्परिणामापायी मरत आहेत. ही गंभीर चिंतेची बाब आहे. सध्या कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून त्यात यश लाभले तर सध्याच्या आणीबाणीवरती नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य होईल असा आशावाद निर्माण झालेला आहे. आज किंवा काही कालखंडानंतर कोरोनावरती नियंत्रण प्रस्थापित करणारी लस शास्त्रज्ञांना तयार करण्यास यश मिळाले तरी आम्ही निसर्ग आणि पर्यावरणाच्या एकंदर चक्रात इतका विस्कळीतपणा अक्षम्य हस्तक्षेपाद्वारे केलेला आहे की आणखी अज्ञात असलेले बरेच विषाणू आणि त्यांचे अनभिज्ञ वाहक मानवी समाजासमोर कोणती परिस्थिती आणणार आहेत याची सुद्धा कल्पना करणे कठीण झालेले आहे.
तिबेटातल्या एका हिमनदीतल्या बर्फात आजपर्यंत माणसाने कधी न पाहिलेल्या 28 विषाणूंची नोंद केलेली आहे. या हिमनदीतील बर्फ पूर्णपणे वितळला गेला आणि जर बर्फाच्या गाभ्यात गोठलेले विषाणू वातावरणात मिसळले तर कोरोनासारखे किंवा त्याहीपेक्षा भयावह संकट उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञांमार्फत व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या विषाणूंची ओळख पटली तर भविष्यातली संकटे टाळणे शक्य होईल. सध्यातरी कोरोना विषाणूच्या संकटाचे निर्मूलन कसे करावे हे मोठे आव्हान मानवी समाजासमोर आ वासून उभे आहे. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लसी तयार करण्यात यश आलेले आहे असा दावा करणाऱया राष्ट्रांमार्फत चाचण्या सुरू झालेल्या आहेत. कोरोनाच्या आजाराला रोखण्यासाठी एखादी लस प्रभावी ठरली तर तो शोध क्रांतिकारी ठरणार आहे आणि त्यामुळे सध्या जगाच्या विविध राष्ट्रांसमोर आणीबाणीची जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यातून भविष्यात मुक्तता करणे शक्य होईल. आज आमचे निसर्गचक्राविरुद्ध अव्याहतपणे जे गैरव्यवहार चालू आहेत, ते नियंत्रित करण्याऐवजी कोरोनामार्फत जे मृत्यूचे तांडव सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरही आम्ही सुधारणा घडविण्याच्या बाबतीत बेफिकीरपणे वागत आहोत. ज्या पशुपक्ष्यांशी सौहार्दाचे नाते प्रस्थापित करून आम्ही आमचे जगणे समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाहक बनवून जे विषाणू माणसांना प्राणघातक मृत्यूच्या खाईत लोटण्याची परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत त्यांना ओळखून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर उभे आहे.