वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष या राज्याला भारतापासून तोडण्याचे कारस्थान करीत असून पश्चिम बंगालला बांगलादेशाशी जोडून ग्रेडर बांगलादेश बनविण्याच्या विचारात हा पक्ष आहे, असा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे अंतिम ध्येय पश्चिम बंगाल भारतापासून अलग करणे हे आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लीमांची मोठी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करीत आहे. राज्यात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत. अत्याचारी लोकांकडून तक्रारी दाखल करणेही अशक्य होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पूर्णतः ढासळली असून राज्याची अराजकाकडे वाटचाल सुरू आहे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाची राज्यात प्रगती होत असून तृणमूल काँग्रेस पक्षाची सर्व देशविरोधी कारस्थाने हाणून पाडली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.