सातारा / प्रतिनिधी
जुलै महिना संपला आहे.तरीही जिल्ह्यात पावसाने तब्बल पंधरा दिवसापासून दडी मारली आहे.त्यामुळे जिल्ह्यात आठ वर्षांपूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती.तशी होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.काही गावांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाऊस नसल्याने धरणांच्या जिल्ह्यातील धरणे अजूनही अर्ध्यावरच आहेत.जिल्ह्यात प्रमुख कोयना धरण 105 टीएमसीचे असून या धरणात केवळ 46 टक्के पाणी साठा आहे.गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के कमी पाणी साठा आहे.
सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.प्रामुख्याने महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर येथे शिवसागर जलाशय, कृष्णा नदीवर धोम, उरमोडी नदीवर परळी येथे उरमोडी, तारळी नदीवर मुरुड नजीक तारळी अशी धरणे आहेत.पश्चिम भागात पावसाचे मोठे प्रमाण असते तर दुष्काळी पूर्व भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडतो.यावर्षी कोरोनाचे संकट आहेच पण पावसाने जरी वेळेवर सुरुवात केली असली तरी पेरणी झाल्यानंतर उघडीप दिली गेली आहे.तब्बल पंधरा ते 20 दिवस पावसाने दडी मारली आहे.या दिवसात भात लागण पूर्ण झालेली असते.यावर्षी अजून भात लागण करण्यासाठी म्हणावा तेवढा पाऊस नाही, त्यामुळे भाताचे लागण रखडली आहे.काही खाचर वाळून जाऊ लागली असल्याने शेतकरी ओढ्यात इजिन बसवून काहीतरी करून भात रोप टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील पूर्व भागात ही शेती धोक्यात आली असून पाऊस आला नाहीत तर उभी पिके पावसाअभावी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
धरण यावर्षी पाणीसाठा टक्केवारी गतवर्षी पाणीसाठा टक्केवारी –
कोयना 46.66 46.60 66.20 66.12
धोम 4.87 41.62 5.37 45.94
बलकवडी 2.00 50.45 3.29 82.97
कण्हेर 4.33 45.17 7.73 80.53
उरमोडी 6.33 65.54 5.51 57.09
तारळी 2.88 49.24 4.98 85.23