प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात रविवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल़ी तर सकाळपासूनच असलेले ढगाळ वातावरण व धुळीने आंबा, काजू पिकावर चाक पडण्याचा धोका निर्माण झाला आह़े यावर्षी चांगली थंडी पडल्याने आबा पीक चांगले येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होत़ी मात्र नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आह़े यामुळे आंबा-काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत़
संगमेश्वर तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात होवून रविवारी सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. अवकाळी पावसामुळे शेतकरी व आंबा बागायतदार त्रस्त झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात गेले महिनाभर ढगाळ वातावरण सुरू आहे. सकाळी धुके, दुपारी कडक ऊन असे वातावरण सुरु असतानाच गेले 10 दिवस ढगाळ वातावरण होते. ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असतानाच शनिवारी मध्यरात्री 1च्या सुमारास संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱयांची झोप उडाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच हळद तसेच वायंगणी शेती घेतली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे हळदीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच तूर या पिकावर रोग पडला असून त्याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदार धास्तावले असून मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंबा व काजू लागण्यास सुरुवात झाली असून अवकाळी पावसामुळे दोन्ही पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. गेल्यावर्षी काजूचे पीक चांगले झाले होते तसेच आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले नव्हते. मात्र यावेळी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने मोठे नुकसान होत आहे.
खेडमध्ये पावसाच्या हलक्या सरी
खेडः रविवारी सकाळच्या सुमारास पावसाच्या पडलेल्या हलक्या सरींनी साऱयांचीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली असतानाच पावसाने लावलेल्या हजेरीने सारेच अचंबित झाले. दिवसभर ढगाळ वातावरण कायमच होते. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता पुन्हा वाढली आहे.
दापोलीत अवकाळी पावसाचा शिडकावा
मौजेदापोली ः तालुक्यात शनिवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने शिडकावा केला तर रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तसेच वाऱयाचा वेगही असल्याने गारवा जाणवत होता. तसेच धुकं व त्यात मातीचे कण दिसून येत होते.वारंवार पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने बागायतदार चिंता व्यक्त करत आहेत. अनेक बागायतींमध्ये अजून मोहोर असून काही ठिकाणी वाटाण्याएवढी फळे आली आहेत, तर काही ठिकाणी आंबा तयार झाला आहे. त्यामुळे या अवकाळीमुळे भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव संभवतो. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम 12 टक्के व मॅन्कोझेब 63 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझॉल 5 मि.ली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पावसापूर्वी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी घेतली असल्यास रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भाव दिसून येत असल्यास उपाययोजना कराव्यात. गोटी ते अंडाकृती अवस्थेत असलेल्या आंबा फळांचे पाऊस तसेच फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच डागविरहित फळांच्या उत्पादनासाठी कागदी (25 बाय 20 सें.मी.) पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळांच्या देठाकडे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. ढगाळ पावसाळी वातावरणामुळे मोठय़ा आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने ’रक्षक’ फळमाशी सापळा प्रतिएकरी 2 या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत. पावसामुळे बागेतील फळांची गळ झाली तर त्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ती त्वरित गोळा करून नष्ट करावीत. काजू पीक बी अवस्थेत असल्याने सध्य हवामान स्थितीमध्ये बोंड व बी पोखरणाऱया अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 15 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद, काळीमिरी, सुपारी पिकांची काढणी हंगाम सुरू असल्याने पावसाची शक्यता लक्षात घेता वाळविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पसरून ठेवावे, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदारांना करण्यात आले आहे.