वृत्तसंस्था / इस्लामाबाद
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी पुन्हा लागू करण्याच्या घोषणेनंतर दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान चर्चेकरता निर्माण झालेल्या अपेक्षांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) डॉक्टर मोइद युसूफ यांनी भारतासोबत आता पडद्याआड कुठलीच चर्चा होणार नसल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानचे अनेक वरिष्ठ अधिकारी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी त्रयस्थ देशात भेटले होते असे मानले जाते.
भारत काश्मीरकरता ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेले निर्णय मागे घेण्यास अयशस्वी ठरल्याने आता पडद्याआडून कुठलीच चर्चा दोन्ही देशांदरम्यान होणार नसल्याचे पाकिस्तानी एनएसएनी म्हटले आहे. भारतासोबतची चर्चा आता संपुष्टात आली आहे. भारतानेच संपर्क साधला होता असा दावाही त्यांनी केला आहे.
याचदरम्यान चर्चेतून पाकिस्तानने अंग काढून घेण्यामागील अन्य कारण समोर येत आहे. अफगाणिस्तानातील बिघडत चाललेली स्थिती हे यामागील कारण असल्याचे समजते. पाकिस्तानने स्वतःचे लक्ष आता अफगाणिस्तानातील तालिबानच्या कारवाया आणि कोरोना महामारी, अर्थव्यवस्था यासारख्या देशांतर्गत समस्यांवर केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून कुठलीच सवलत देण्यात आली नसताना पाकिस्तानने शस्त्रसंधी मानल्याने तेथील सरकारवर टीका होत आहे.