पाटगांव / वार्ताहर
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटगांव मध्यम प्रकल्पातील मौनी सागर जलाशय पुर्ण क्षमतेने भरला असून धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या सकाळ पर्यंत धरणाच्या पाण्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठी च्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तालुक्यात मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटल्याने प्रशासनाने पाटगाव कोंडोशी फये धरणाच्या जलसाठा वर लक्ष ठेवुन आहेत. गेले दोन दिवस कार्यकारी अभियंता स्मिता माने व पाटबंधारेचे अधिकारी पाटगाव धरणाची पाहणी करून अपडेट जाणून घेतला.
गतवर्षी पाटगाव धरण 16 ऑगस्टला भरल होत. पण यावर्षी पूर्ण नियंत्रणासाठी विसर्ग चालू ठेवणे धरण भरण्यासाठी तब्बल एक महिना वाट पहावी लागली यावर्षी 22 जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्ड ब्रेक 436 मिलिमीटर पाऊस झालेला होता. त्यावेळी धरणांमध्ये 84 टक्के पाणी साठा शिल्लक होता. त्यानंतर पाटगाव परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत होता. त्यामूळे प्रशासनाने खबरदारी घेऊन धरणातुन अगोदरच विसर्ग चालु ठेवल्याने धरण भरण्यास उशीर लागत होता. पण गेले दोन दिवस धरण परिसरात संततधार पाऊस पडत असून मौनी सागर जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होऊन. धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात सुमारे ३.७५ टि.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. जुन पासुन धरण परिसरात आज अखेर सुमारे ५७०० मि .मि.पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्प पूर्ण संचय पातळी – 626.60 मी. इतकी झाली आहे.
आजचा एकूण पाणीसाठा 105 द.ल.घ. आहे. गतवर्षाच्या तुलनेत सुमारे २०० मि.मि. जास्त पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात पाटगांव परिसरात 150 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कोंडूशी आणि फये लघु प्रकल्प अगोदरच भरले आहेत. सततच्या पावसाने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. सततच्या पावसामुळे नदी काठच्या उस पिकासह भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर परिस्थितीवर भुदरगडचे तहसिलदार आश्विनी वरुटे, पाटबंधारे विभागीय अधिकारी संभाजी भोपळे, शाखा अभियंता मनोज देसाई लक्ष ठेवुन आहेत.