प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. येत्या सहा महिन्यात या कामास प्रारंभ होणार असून पाणी पुरवठय़ाचे काम कंपनीकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळामध्ये हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांचे काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सध्या हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांना कमी केल्यास शेकडो कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
शहरात सध्या दहा वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली योजना यशस्वी झाल्याने उर्वरित 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता जागतिक बँकेच्या सहकार्याने 48 वॉर्डांमध्ये या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम एल ऍण्ड टी या नामवंत कंपनीकडे सोपविले आहे. एकूण 12 वर्षांच्या कालावधीकरिता या कामाची जबाबदारी कंपनीकडे देण्यात आली आहे. पहिल्या 4 वर्षात योजनेकरिता सर्वेक्षण करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कालावधीत जलवाहिन्या घालणे, जलकुंभांची उभारणी करणे, नळ जोडण्या देणे, अशी विविध कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर पुढील आठ वर्षांच्या कालावधीत 24 तास पाणीपुरवठा करणे आणि योजनेची देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीकडे राहणार आहे. या कामाकरिता एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले असून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सध्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतर कंपनीकडे करावे लागणार आहे. पाणी पुरवठय़ाचे काम कंपनीच्या कर्मचाऱयांकरवी करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळात काम करणाऱया 450 कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
पाणीपुरवठा मंडळामार्फत शहरात पाणीपुरवठा केला जातो. याकरिता व्हॉल्व्हमन, बिल कलेक्टर, ऑपरेटर व इतर कामगारांची हंगामी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ही कामे करण्यासाठी 450 हून अधिक कामगारांची नियुक्ती हंगामी तत्त्वावर केली आहे. ही योजना राबविण्यासाठी कंपनीकडे हस्तांतर केल्यास कंपनीमार्फत कामकाज पाहण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे असलेल्या हंगामी कामगारांना कमी करण्याची शक्मयता आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काही अधिकाऱयांनी हंगामी कामगारांना याबाबत सूचना केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.