प्रतिनिधी/ बेळगाव
पाणी पुरवठा करण्याचा विभाग महापालिकेच्या अखत्यारितच होता. त्यामुळे आम्ही तब्बल 15 वर्षे महापालिकेच्या सूचनेनुसारच काम करत आलो. मात्र त्यानंतर पाणी पुरवठा मंडळ हा विभाग स्वतंत्र करण्यात आला. त्या ठिकाणी आम्ही दहा वर्षे काम केली आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र आम्हाला नोकरीमध्ये कायम स्वरुपी सामावून घ्यावे, अशी मागणी पाणी पुरवठा मंडळातील कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाणी पुरवठा मंडळामध्ये आम्ही काम करत आलो आहे. पाणी पुरवठा मंडळ केयूडीडब्ल्यूकडे सोपविण्यात आले. त्यानंतरही आम्ही आजपर्यंत काम करत आहे. मात्र आता 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी चेन्नईच्या एलएनटी या कंपनीकडे कंत्राट सोपविण्यात आले आहे. त्यांनी पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट घेतल्यामुळे आमच्या नोकरीवर गदा येऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या विभागामध्ये आम्ही 25 वर्षे काम करत आहोत. महानगरपालिकेच्या अखत्यारितच आम्ही काम करत आलो आहे. तेंव्हा आमच्या एकाही कर्मचाऱयावर नोकरी सोडण्याची वेळ येऊ नये याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मंजुनाथ दोडवाड, सुब्रमण्यम् कांबळे, नागराज बदामी, विठ्ठल कांबळे, सिद्धराम तळवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.