प्रतिनिधी/ फोंडा
वळवई येथे मांडवी नदीच्या पात्रातून प्रवास करणारी ‘वळवई-सुर्ला’ फेरीबोट अचानक इंजिनात बिघाड झाल्याने नदीच्या मध्यावर्ती अडकली. यावेळी सुमारे 15 प्रवाशी फेरीबोटमध्ये अडकले. ग्रामस्थानी दाखविलेल्या धाडसामुळे मधोमध अडकलेली फेरीबोट सुखरूप धक्य़ावर पोचली. सदर घटना काल बुधवारी रात्री 8.30 वा. सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार वळवई सुर्ला फेरीबोट 15 प्रवाशी व वाहने घेऊन पैलतीरी सुर्ला येथे जात होती. अचानक फेरीबोटचे इंजिन निकामी झाल्याने नदी पात्राच्या मधोमध अडकली. मदतीला वळवई-मायणा ही छोटी फेरीबोट बोलाविण्यात आली. मात्र पाण्य़ाचा प्रवाह जास्त असल्याने तेही प्रयत्न उलटे झाले व फेरीबोट अधिकच वाहून गेली. सर्व प्रकार वळवई येथील ग्रामस्थ किनाऱयावरून बघत होते. त्यानंतर त्यानी धाडसी पाऊल उचलताना जीवाची तमा न करता एका नावाडीने आपल्या होडीसह दोरखंड घेऊन वाढलेल्य़ा पाण्याच्या प्रवाहातून अडकलेल्या फेरीबोटीकडे धाव घेतली. फेरीबोटीला दोहोबाजूने बांधले, दोरखंड किनाऱयावरील लोकांकडे पोचविल्यानंतर सुमारे 40 लोकांनी जोर लावून फेरीबोट ओढून धक्यावर पोचविली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या धाडसाचे प्रवाशांनी कौतुक केले व त्याचे आभार मानले.