प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पार्टी आता राज्यातील नगरपालिका निवडणुकीवर नजर ठेवून आहे. जर बहुतांश पालिकांवर विजय मिळाला तर भाजप मध्यावधी विधानसभा निवडणुकाही घेऊ शकते. भाजप कार्यकर्त्यांना हा संदेश पोहोचविल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तथापि, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांनी मात्र तसा निर्णय अद्याप झालेला नाही, असे सांगितले.
राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आहे, मात्र राज्य भाजपमध्ये 12 आमदार हे इतर पक्षांतून आलेले आहेत. गोवा विधानसभेची मुदत 18 मार्च 2022 रोजी संपुष्टात येतेय. तत्पूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होतील.
भाजपमध्ये उत्साह, काँग्रेसची वाताहात
सध्या भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजपमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला आहे. त्यातच काँग्रेस पक्षाची घडी पूर्णतः विस्कटलेली आहे. प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका असणाऱया काँग्रेस पक्षाची वाताहात झालेली आहे. या पक्षाला भाजप विरोधात निवडणूक लढविण्यासाठी तळागाळातून पक्षाची उभारणी करावी लागेल तसेच उमेदवार निश्चित करण्यासही थोडा कालावधी लागेल. यामुळेच भाजपने प्राप्त परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱया राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची वाट पाहाण्याचे ठरविले आहे.
अकरा पालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत
सांखळी व फोंडा या दोन नगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. उर्वरीत 11 पालिका व पणजी मनपाची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्यावर भाजपमध्ये एकमत झालेले आहे.
पालिका निडणुका पक्षीय पातळीवर नाही
पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा आग्रह पक्षाची काही उत्साही नेत्यांनी धरला मात्र प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यास नकार दर्शविला. त्यामुळे आता पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर होणार नाहीत.
भाजप लवकरच निश्चित करणार उमेदवार
पालिका निवडणुकीसाठी भाजप आपले उमेदवार निश्चित करणार आहे. विरोधी पक्षांमध्ये फूट पडलेली असल्याने ते आपसात लढतील व भाजपला जर 11 पैकी 10 व पणजी मनपा ताब्यात आली तर भाजप नव्याने जनमत कौल विधानसभेच्या माध्यमातून घेण्याची तयारी करील.
एप्रिल-मे 2021 मध्येही होऊ शकते विधानसभा निवडणूक
तामिळनाडू, पं. बंगाल, आसाम, पौंडिचेरी व केरळ या राज्यांच्या निवडणुका एप्रिल – मे 2021 मध्ये होतील. त्यांच्याबरोबरच गोव्याच्या निवडणुका देखील घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या या वृत्ताने एकच उत्साह संचारलेला आहे. या संदर्भात पक्षाच्या काही नेत्यांशी संपर्क साधला असता भाजपच्या कोअर कमिटीने कोणता निर्णय घेतलेला आहे, याची माहिती नाही, मात्र पक्षीय पातळीवर याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे मोघम उत्तर दिले.