सावंतवाडी : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना : आगामी काळातील संघर्षाची नांदी
विजय देसाई / सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिकेच्या डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत संजू परब निवडून आले. परब यांच्या रुपाने सावंतवाडी पालिकेवर भाजपचा पहिला नगराध्यक्ष विराजमान झाला. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांची सलग 23 वर्षे असलेली एकहाती हुकुमत संपुष्टात आली. याचे शल्य केसरकर यांना आहे. त्यामुळेच सावंतवाडी पालिकेच्या आगामी निवडणुकीला आठ महिने असताना केसरकर यांनी सावंतवाडी पालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
वर्षभरात पालिकेत जे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे निर्माण झालेल्या वादंगामुळे केसरकर यांना लक्ष घालण्याची संधी चालून आली. ही संधी न दवडता त्यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा पालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात केसरकर विरुध्द नगराध्यक्ष परब असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. केसरकर यांच्यावर परब यांनी गेली सात-आठ वर्षे टिकेची झोड उठविली. परंतु त्याची दखल केसरकर यांनी कधीच घेतली नव्हती. परंतु पालिकेत गेल्या वर्षभरात जे निर्णय घेण्यात आले, त्यावरून उठलेल्या वादळामुळे केसरकर यांना अखेर लक्ष घालावे लागले.
23 वर्षे पालिकेवर सत्ता
सावंतवाडी शहर आमदार केसरकर यांच्या राजकीय प्रवासातील महत्वाचे साक्षीदार असलेले शहर. या शहरातूनच केसरकर यांची सामाजिक, राजकीय वाटचाल फुलत गेली. रोटरी क्लबपासून सामाजिक कार्याला सुरुवात करत स्वीकृत नगरसेवक ते राज्याचे मंत्री असा यशस्वी प्रवास केसरकर यांचा झाला. ते तीन वेळा आमदार झाले. त्यांच्या विजयात शहराचा मोठा वाटा राहिला. सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहराला विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. शहराला एक ओळख निर्माण करून दिली. त्यांची पालिकेत 23 वर्षे एकहाती हुकुमत राहिली. विरोधकांनी त्यांचे शहरातील वर्चस्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला. परंतु ते विरोधकांना पुरून उरले. मात्र, बबन साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. भाजपची पालिकेत सत्ता आली. शिवसेनेने काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसेला सोबत घेऊनही पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे केसरकर यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. त्याचे शल्य केसरकर यांच्या मनात आहे.
अनेक निर्णयावरून नाराजी
शहरात परब यांच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला. परंतु ते नगराध्यक्ष झाल्यानंतर आठवडा बाजाराचा मुद्दा वादग्रस्त ठरला. त्यामुळे परब आणि व्यापारी असा संघर्ष झाला. हा संघर्ष सुरू असताना कोरोनाचे संकट आले. त्यामुळे परब यांच्या कारभाराला मर्यादा आल्या. त्यांनी या काळात कोरोनापासून बचावासाठी काम केले. परंतु नंतर जुलैमध्ये संत गाडगेबाबा मंडईबाहेर बसणाऱया भाजी विक्रेत्यांना हटवून आतमध्ये बसण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजी विपेते आणि पालिका असा संघर्ष झाला. हा संघर्ष शमत असतानाच इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि ओटेधारक यांच्याकडून सुधारित दराने प्रीमियम आणि मासिक भाडे वसूल करण्याचा निर्णय परब यांनी घेतला. कोरोना काळात हा निर्णय घेतल्याने संकुलातील व्यापारी नाराज झाले. त्यानंतर दिवाळीदरम्यान शहरातील सुशिक्षित बेरोजगार रवी जाधव यांनी बाजारपेठेत लावलेला स्टॉल पालिकेने हटविला. त्यामुळे पुन्हा नगराध्यक्ष परब विरोधकांच्या टार्गेटवर आले. याच कारवाईच्या अनुषंगाने बाजारपेठेतील बसस्टॉपची जागा लिलाव न करता देण्याचा स्थायी समितीने घेतलेला निर्णयही वादग्रस्त ठरला. नगराध्यक्ष परब विविध निर्णय घेत असताना ते शहराच्या सुधारणेसाठी आणि विकासासाठी असल्याचे सांगत असले तरी त्यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत होती. पालिकेत शिवसेना विरोधी पक्ष असल्याने या पक्षाकडून या निर्णयांवर टीका होऊ लागली.
शहराच्या कारभारात सक्रिय
ही टीका होत असताना आमदार म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे
तक्रारी जात होत्या. परंतु याबाबत ते केवळ मतप्रदर्शन करत असत. मात्र, विकास कामांच्या अनुषंगाने भूसंपादनासाठी दिलेला निधी तसेच अन्य निधी खर्च होत नसल्याने केसरकर यांनी मुख्याधिकाऱयांशी सल्लामसलत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संकेश्वर-रेडी राष्ट्रीय महामार्गासंबधात त्यांनी पालिकेत थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसोबत बैठक घेतली. तर रवी जाधव यांच्या स्टॉलच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशाची पूर्तता होत नसल्याने त्यांनी मुख्याधिकाऱयांसमवेत बैठका घेऊन तोडगा काढला. मात्र, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी शहराचा विकास आपण आणलेल्या निधीतूनच झाल्याचे सांगतानाच पालिका मुख्याधिकाऱयांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वेळ द्यावा, अशा सूचना केल्या. त्यातून केसरकर यांनी यापुढे शहराच्या कारभारात लक्ष घालण्याचे संकेत देत नगराध्यक्ष परब यांचे नाव घेऊन प्रथमच हल्ला केला.
संघर्ष वाढण्याची चिन्हे
पालिकेची निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. अशावेळी केसरकर यांनी शहराच्या विकासकामात घातलेले लक्ष हे पालिकेवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचललेली पावले आहेत. केसरकर यांच्या इराद्यामुळे नगराध्यक्ष परब यांनीही सावध पावले उचलत केसरकर यांचा पालिकेतील हस्तक्षेप मान्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येणार तसतसे शहरात केसरकर आणि परब यांच्यातील संघर्ष वाढत जाणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. केसरकर पालिकेत सत्ता आणून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. तर केसरकर यांच्या या प्रयत्नांना ब्रेक लावण्यासाठी परब आणि भाजप कार्यरत राहणार आहेत. त्याची झलक आतापासून पाहायला मिळत आहे. त्यात कोण बाजी मारणार, हे काळच ठरविणार आहे. परंतु केसरकर यांनी शहरात घातलेले लक्ष भाजप आणि परब यांची डोकेदुखी वाढविणार हे निश्चित आहे.