मुंबईत पावसाने 31 जणांचे बळी घेतल्याने पावसाळय़ातील दुर्घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा गडद झाला आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’, असे म्हणतात. त्या अनुषंगाने ‘नेमेची येतात आपत्ती,’ असेच आता म्हणावे लागेल. दरडी वा इमारत कोसळणे, भिंत खचणे, पूर येणे यासारख्या दुर्घटना प्रत्येक पावसाळय़ात कुठे ना कुठे घडत असतात. मात्र, त्यापासून आपण कोणताही धडा घेतलेला नाही, हेच वारंवार अधोरेखित होताना दिसते. चेंबूरमधील डोंगर भागातील दरड आणि संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळून त्यात 19 जणांचा मृत्यू होणे, ही घटनाही अशीच. वरकरणी ही नैसर्गिक आपत्ती वाटावी. परंतु, या साऱयास निसर्ग नव्हे तर कमालीचा बेजबाबदारपणा वा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते. पावसाळय़ात दरडी कोसळण्याची शक्यता सर्वाधिक असते. ती गृहीत धरून या काळात आवश्यक काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. तशी ती चेंबूरची घटना घडण्यापूर्वी घेतली असती, तर नाहक इतक्या जणांचे बळी गेले नसते. यापूर्वीही मुंबईत इमारत, भिंत वा दरडी कोसळून कित्येकांना प्राण गमवावा लागण्याची उदाहरणे आहेत. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात बारा जण मृत्युमुखी पडल्याचा इतिहासही तसा अलीकडचाच. त्यानंतर चेंबूरबरोबरच विक्रोळी व भांडूपमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडतात. हे सारे आपली नागरव्यवस्था ठिसूळ झाल्याचेच लक्षण होय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबईत राहण्याचा प्रश्न जटिल असला, तरी पोटापाण्याचा प्रश्न मिटतो. कुठेतरी छोटी मोठी नोकरी मिळते, अशी लोकभावना आहे. ती बऱयाच अंशी खरीही म्हणता येईल. स्वाभाविकच मुंबईच्या दिशेने वर्षानुवर्षे स्थलांतर होते आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोकसंख्येचे केंद्रीकरण झाल्याने या शहरावर जो ताण आला, त्यातूनच अनेक समस्या निर्माण झालेल्या दिसतात. डोंगरभागात दाटीवाटीने उभारण्यात आलेली घरे, झोपडय़ा, निकृष्ट दर्जाच्या इमारती, धोकादायक स्थितीत असतानाही त्यात राहणारे नागरिक, हे येथील नेहमीचे चित्र बनले आहे. कसाबसा तगून राहणारा हा डोलारा बव्हंशी पावसाळय़ात कोसळतो आणि होत्याचे नव्हते होते. हे कुठवर चालणार, हाच खरा प्रश्न आहे. दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली जाते. या सोपस्काराच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. ज्या भागात दरडी वा इमारत कोसळण्याची भीती आहे, तेथील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर व्हायला हवे. त्याचबरोबर अशा संवेदनशील भागात झोपडय़ा वा घरे उभारली जाऊ नयेत, यासाठीही पालिका प्रशासनाने दक्ष रहायला पाहिजे. मुंबईत दमदार पाऊस होतो. परंतु, पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था पुरेशी ठरत नाही. त्यामुळे रस्ते जलमय होणे, पाणी साठणे, हे प्रकार दरवर्षी घडत असतात. 26 जुलैच्या पावसाने मुंबईत काय हाहाकार उडविला, हे आजही कुणी विसरू शकणार नाही. त्यामुळे नागरीकरणाच्या ओझ्याने वाकलेल्या या शहराला ताठ कण्याने उभे करण्यासाठी आधी त्यावरचा ताण कसा कमी करता येईल, हे पहायला हवे. आपल्याकडे नगर नियोजन वा नगर रचना हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. आगामी काळात या आघाडीवर आपल्याला बरेच काम करावे लागेल. मुंबईच्या पाठोपाठ पुणे, नाशिक अशा अनेक महानगरांचा प्रवासदेखील आज याच मार्गाने होत आहे. तो अत्यंत घातक म्हणता येईल. निसर्गाला दोष देऊन आपल्यावरील जबाबदारी टाळणे, ही वास्तविक आत्मवंचना असून, असा पलायनवादी दृष्टिकोण योग्य नव्हे. भविष्यात अशी संकटेच उत्पन्न होऊ नयेत, याकरिता सर्वपक्षीय प्रयत्न व्हावेत. त्याचबरोबर लोकांचीही या प्रयत्नांना साथ हवी. आमचे काही होवो, आम्ही येथेच राहणार, यामागील लोकांची भावना समजून घेण्यासारखी असली तरी असा जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. म्हणूनच राज्यकर्त्यांनीही या प्रश्नाच्या मुळाशी जावे. संबंधित घटकांशी गांभीर्याने चर्चा करावी. त्यातूनच यावर सुवर्णमध्य काढता येईल. अन्यथा हे सत्र असेच सुरू राहण्याची भीती संभवते. तसा यंदा मोसमी पाऊस वेळेत दाखल झाला. मात्र, ऐन जून व जुलैमध्ये पावसाने ताण दिला. कोकण किनारपट्टी वगळता अन्यत्र दमदार पावसाची नोंद न झाल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरण्या करण्याची वेळ शेतकऱयांवर आली. राज्याच्या काही भागात मुसळधार, तर उर्वरित भागात जीवाला घोर असे चित्र पहावयास मिळाले. हवामानातील हे बदलते घटक चिंताजनक म्हणायला हवेत. आता सारी भिस्त ही पुढच्या पावसावर असेल. कारण राज्याच्या अनेक भागातील पाणीसाठा आता लक्षणीयरीत्या घटला आहे. त्यामुळे अनेक शहरांवर सध्या पाणीटंचाईचे संकट घोंघावताना पहायला मिळते. पुढच्या काही दिवसात, तसेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविणे, हा दिलासा म्हटला पाहिजे. ओला असो वा कोरडा, कोणताही दुष्काळ मारकच असतो. महाराष्ट्राने वेळोवेळी अशा दोन्ही प्रकारच्या दुष्काळाचे चटके सोसले आहेत. अर्थात अशा कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्याने नेहमी सज्ज असले पाहिजे. आजचा धरणसाठा व पावसाचे प्रमाण पाहता पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही. पुढच्या टप्प्यात कसा पाऊस पडतो, पाणलोट क्षेत्रात किती साठा होतो, यावर धरण व्यवस्थापन करावे लागेल. त्यादृष्टीने सर्व त्या शक्याशक्यता ध्यानात घेऊन सरकारने धोरण ठरवावे. मोसमी पाऊस हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पाऊस वा निसर्गाच्या रमणीयतेला तोड नाही. मात्र, हा पाऊस वा निसर्ग माणसाला नेहमी इशारेही देत असतो. त्या इशाऱयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डोंगर, दऱया, नद्या, नाले, झाडे हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना नख लावले, की काय होते, ते मिठीच्या मगरमिठीपासून ते उत्तराखंडच्या प्रलयापर्यंत आपण अनेकदा पाहिले आहे. म्हणूनच मुंबईच्या दुर्घटनेतूनही योग्य तो धडा घ्यायला हवा.
Trending
- निर्णय नाही झाला तर गप्प बसणार नाही…मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार- राजू शेट्टी
- वाढदिवस करून परतताना एकाच कुटुंबातील ६ जणांवर काळाचा घाला
- +923130624785 पाकिस्तानी नंबरपासून जनतेने सावध रहावे
- सांडपाणी जोडणी नसल्याने मडगावात हॉटेल्सवर कारवाई
- आयसीसी टी-20 विश्वचषक धमाका
- लोकायुक्तांची धडक… मनपा अधिकाऱ्यांना धडकी
- हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला मिळणार गती
- गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको