प्रतिनिधी/ संकेश्वर
गत आठ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने सोयाबिन, कापूस, भुईमूग आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जूनच्या मध्यावर झालेल्या दमदार पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील पेरणी कामे आटोपली आहेत. तसेच पेरणीनंतर पिकांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली आहे. दरम्यान गत आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. यातच उन्हाचे चटके बसू लागत असल्याने फुटलेले अंकुर करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना महामारी व महागाईच्या बडग्याने हैराण झालेल्या जनतेला जून मध्यावर पावसाने चांगली साथ दिली. यामुळे पेरणी कामे शेतकऱयांनी आटोपली. तसेच दमदार पावसामुळे उगवण चांगली झाल्याने बळीराजा समाधानी होता. असे असतानाच पावसाने गत आठ दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱयांना पिकांना विहिरी, कूपनलिका, नदीच्या पाण्याचा आधार घेत पाणी देण्याची वेळ आली आहे. तर माळरानातील पिकांना मात्र फटका बसत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यामुळे पावसासाठी शेतकरी धावा करताना आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.