प्रतिनिधी/ शिखर शिंगणापूर
माण तालुक्याच्या उत्तर भागातील वावरहिरे, थदाळे, शिंगणापूर, मोही,डंगिरेवाडी, दानवलेवाडी, सोकासन या परिसरात यंदा सर्वत्र पावसाने दांडी मारल्याने शेतकरी व मजुर वर्ग चिंता व्यक्त करत आहेत. सुरुवातील या भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्याने खरिप हंगामातील बाजरी, मका, मुग, चवळी, मटकी, भुईमुग या पिकांची महागडय़ा बि-बियाणांच्या कमी अधिक प्रमाणात पेरण्या उरकून घेतल्या. मात्र आता पावसाने दांडी मारल्याने येथील शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
मान्सुनपुर्व पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मृगाचा पाऊस वेळेवर पडेल आणि पेरण्या वेळेवर होणार असा अंदाज शेतकऱयांनी लावला होता. त्यामुळे शेतकऱयांनी पतसंस्था, सरकारी बॅंका, सोसायटी यांच्या मार्फत तसेच हात उसने पैसे घेवून खत बियाणे घेवून पेरणीची तयारी केली. तालुक्यातील बहुतेक शेतकऱयांनी ट्रक्टरच्या साह्याने तर काहीनी बैलजोडीच्या मदतीने चाडय़ावर मुठ आवळली आहे. मात्र परिसरात आठ दिवसांपासुन पावसाने दांडी मारल्याने पावसाअभावी पिके करपून जात आहेत. अनेक शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने शेतकरी हलावदिल झाला आहे.