म्हणे रस्त्याचे रुंदीकरण 110 फुटाचे करू : व्हीटीयूकडून कामकाजाला सुरुवात : पिरनवाडीतील बहुतांशी व्यापारीवर्ग देशोधडीला
वार्ताहर /किणये
बेळगाव परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी हडप करण्याचे षड्यंत्र सरकारने रचले आहे. त्यानुसार प्रशासन व पोलीस बळाचा वापर करून शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात येत आहेत. शेतकरी टाहो फोडून विरोध करीत आहेत. आंदोलन तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. हे प्रकरण ताजे असतानाच आता पिरनवाडीतही भू-संपादनाचा घाट प्रशासनाने घातला आहे.
पिरनवाडी नाका ते व्हीटीयूपर्यंत 140 फूट रस्ता करावयाचा आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पिरनवाडीत शुभारंभाचा नारळ फोडून स्थानिक व्यावसायिकांच्या पोटापाण्याच्या रोजंदारीवरच कुऱहाड चालवली आहे. यामुळे नागरिक व दुकानदारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आम्ही पिरनवाडीच्या लोकांनी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी पिरनवाडीतील काही शेतकऱयांच्या जमिनी व घरच्या आजुबाजूच्या जमिनी दिलेल्या आहेत. आता बाजारपेठेच्या मुख्य बेळगाव-जांबोटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जमीन हडप करून केवळ रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे. यामुळे अनेक स्थानिक नागरिक व दुकानदारांची जणू झोपच उडाली आहे. विकास करण्याच्या नावावर सरकार आम्हा गरीब दुकानदारांवर उपासमारीचे संकट आणणार आहे, आम्हाला देशोधडीला लावणार आहे तर मग आम्ही यासाठी तीव्र आंदोलन छेडणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पिरनवाडी हे गाव सध्या पश्चिम भागातील नागरिकांसाठी मुख्य केंद्रबिंदू बनलेले आहे. या गावात विविध प्रकारची किराणा, कपडे, भांडी, औषधे, पानशॉप तसेच इतरही दुकाने आहेत. यामुळे येथे खरेदीसाठी पिरनवाडी भागाच्या आजुबाजूचे लोक मोठय़ा प्रमाणात येत असतात. यातील बरीच दुकाने पिरनवाडी नाक्यापासून ते पिरनवाडी दर्ग्यापर्यंत आहेत. जर रस्त्याचे रुंदीकरण केले तर यामधील 80 टक्के दुकाने जमीनदोस्त होणार आहेत, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली. सरकारने बेळगाव परिसराचा विकास जरूर करावा. पण स्थानिक शेतकरी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांच्या रोजीरोटीचा विचार जरूर करावा, असे मत पिरनवाडीतील नागरिकांतून व्यक्त होत आहे. पिरनवाडी नाका ते व्हीटीयूपर्यंत 140 फुटांचा रस्ता मंजूर झाला आहे, असे लोकप्रतिनिधी स्थानिकांना सांगत आहेत. स्थानिक लोकांनी विरोध केल्यावर आम्ही किमान 110 फूट रत्याचा विचार करू, असे ते सांगत आहेत, अशी माहिती पिरनवाडीतील काही तरुणांनी दिली आहे.
पिरनवाडीतील या रस्त्यासाठी आता पुन्हा आंदोलन चिघळणार असून किमान 60 ते 70 फुटांपेक्षा अधिक रस्त्याचे रुंदीकरण करू नये, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या रस्त्याला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी पिरनवाडीतील काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. कोणत्याही परिस्थितीत आपण आमची घरे, दुकाने रस्त्यासाठी देणार नाही, असा इशारा दिला आहे.
शेतकरी-दुकानदारांवर बळजबरी
वारंवार गोरगरीब शेतकरी, दुकानदार यांच्यावर बळजबरी करून त्यांच्या मालकीच्या जमिनी हडप करण्यासाठी सरकार नेहमीच अग्रेसर झालेले आहे. पिरनवाडीतल्या रस्त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारने काहीतरी स्थानिक लोकांचा, तिथल्या व्यावसायिकांचा विचार करायला हवा. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी जेव्हा पिरनवाडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्त्याची उंची वाढविण्यात आली. संबंधित आराखडय़ाचा कोणीही विचार केला नाही. गटारींचे काम अर्धवट ठेवण्यात आले. यामुळे आजही स्थानिक लोकांना गटारींची व पावसाचे पाणी याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
– पिराजी मुचंडीकर
दुकानदारांवर उपासमारीची वेळ
गेल्या 25 ते 26 वर्षांपासून मी पिरनवाडी भागात एक छोटेसे पान शॉप चालवून संसाराचा गाडा हाकतो आहे. आता रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी चर्चा पिरनवाडीत जोरदार सुरू आहे. हे काम आम्हा दुकानदारांच्या पोटापाण्यावर उपासमारीची वेळ आणणारे आहे. जर माझे पान शॉप या रस्त्याच्या रुंदीकरणात पाडले गेले तर आम्ही जगायचे कसे? हे सुद्धा सरकारनेच सांगावे.
– मुक्तार मुजावर
सरकारचे कटकारस्थान
बेळगाव-पणजी महामार्ग व बेळगाव-चोर्ला रस्ता या दोन्ही रस्त्यांच्यामध्ये आमचे घर आहे. घराच्या समोरील म्हणजे पिरनवाडी-चोर्ला रस्त्याजवळ सुमारे साडेसात फूट आत मार्किंग करण्यात आले आहे. यामुळे आमची झोपच उडाली असून हे सर्व कटकारस्थान असून यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे. आम्ही आंदोलन करणार पण आमची जमीन देणार नाही.
– सुरेश कडेमनी