विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांवर कारवाई : अनेक गावांत स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन
वार्ताहर / किणये
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊन असूनही काही जण विनाकारण घराबाहेर पडू लागले आहेत. अशा विनाकारण फिरणाऱयांवरती आता पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. बेळगाव-पणजी महामार्गानजीक पिरनवाडी येथे वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनला सुरुवात झाल्यापासून नागरिकांनी बऱयापैकी प्रतिसाद दिला आहे. तालुक्याच्या काही गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन करीत आहेत. आपल्या गावातून कोरोना हद्दपार व्हावा व कोरोनाची साखळी तुटावी हाच या याचा मुख्य उद्देश आहे. असे असले तरीही घरी बसून कंटाळवाणा वाटलेले काहीजण विनाकारण घराबाहेर फिरू लागले आहेत. अशांवरती पोलीस कडक निर्बंध लागू करत आहेत.
लॉकडाऊन काळात सकाळी 10 पर्यंत जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. यामुळे पिरनवाडीच्या बाजारात सकाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे. 10 नंतर मात्र या परिसरात पोलीस गस्त घालून दहाच्या आत साऱयांना घरी जाण्याचे आवाहन करू लागले आहेत.
सहकार्य करण्याची गरज
पिरनवाडी या मुख्य रस्त्यांवरून वाहनधारकांची वर्दळ वाढू लागली आहे. प्रशासनाने मुभा देण्यात आलेल्या वाहनधारकांव्यतिरिक्त तसेच दवाखान्याला ये-जा करणाऱया व्यतिरिक्त इतर वाहनधारकांची मात्र चौकशी करीत आहेत. व त्यांना माघारी घरी पाठविण्यात येत आहे. प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर न पडता घरात राहून सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.