…म्हणे म. ए. समितीवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची विधानसभेत मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती वारंवार आमची कळ काढते आहे. कन्नडिगांच्या सहिष्णुतेचा दुरुपयोग करून घेण्यात येत आहे. कन्नडिगांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱया म. ए. समितीवर बंदी घालावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी विधानसभेत केली.
गेल्या चार दिवसांत घडलेल्या अप्रिय घटनांवरील चर्चेच्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा या महापुरुषांची विटंबना करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे कन्नड ध्वज जाळण्यात आला आहे. ध्वज पेटवून अस्मितेलाच धक्का पोहोचविण्यात आला आहे. त्यामुळे म. ए. समितीवर बंदी घालण्यात यावी. कायद्यातील तरतुदी पडताळून पहाव्यात, असा सल्लाही सिद्धरामय्या यांनी दिला.
गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत का? त्यामुळेच या घटना घडल्या आहेत. आपण स्वतः सोमवारी सकाळी अनगोळला भेट देऊन आलो आहोत. पुतळा विटंबनेत गुंतलेल्यांना तडीपार करावे. अशा घटना रोखून अस्मिता जोपासण्याच्या मुद्दय़ावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही सारे एक आहोत, याचा संदेश दिला पाहिजे. सभागृहात ठराव करून पंतप्रधानांनाही पाठवावा. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असा सल्ला सिद्धरामय्या यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकचे होते, असा जावईशोधही त्यांनी मांडला. संगोळ्ळी रायण्णा यांना फंदफितुरीने पकडून देण्यात आले. त्यांच्या पुतळय़ाची विटंबना म्हणजे साऱया देशाचा अपमान आहे. अशा मुद्दय़ांवर राजकारण न करता सरकारने कडक कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱयांनाही तडीपार करावे. गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यात यावी, असा सल्ला देतानाच लालपिवळा जाळण्याची घटना कोल्हापूर येथे घडली आहे. यामागे त्यांचा उद्देश काय आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली.
पुतळय़ाची विटंबना प्रकरणावर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, प्रत्येकाला आपली भाषा व आपले राज्य याबद्दल अभिमान असावा. म्हणून दुसरी भाषा आणि राज्याचा अवमान करण्याची वृत्तीही नसावी. शिवपुतळा व संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ांचा अवमान करण्याच्या घटना निषेधार्ह आहेत. महाराष्ट्र सरकारने लालपिवळा जाळणाऱयांवर कारवाई करावी. आंदोलनाच्या नावावर सुरू असणारी तोडफोड सरकारने गांभीर्याने घ्यावी. अधिवेशनाच्या काळात गोंधळ माजविण्यामागे षड्यंत्र आहे का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी
ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंडसुख घेतले. एमईएस म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर ‘महाराष्ट्र भेकडांची संघटना’ आहे, अशी टिप्पणी केली. रात्रीचे पुतळे काय फोडता? हिंमत असेल तर दिवसा भिडा, असे आव्हान देतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लालपिवळा पेटविल्याप्रकरणी अद्याप उत्तर का दिले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे एक षड्यंत्र आहे. यामागे कोण आहे? याचा शोध घेतानाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांशी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असा सल्लाही दिला.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, निजदचे शिवलिंगेगौडा, कुमार बंगारप्पा, कृष्णा रेड्डी, लिंगेश रिजवान अर्शद, सा. रा. महेश, ए. टी. रामस्वामी, देवानंद चव्हाण आदींनी या चर्चेत भाग घेतला. बहुतेक आमदारांनी म. ए. समिती व शिवसेनेवर तोंडसुख घेतले. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी यापूर्वी म. ए. समितीचे पाच आमदार होते. आज ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत ‘काशीला कला जाती, मथुरा की मस्जीद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी’ या काव्यपंक्ती उद्घृत केल्या.
उर्दूच्या उल्लेखावरून गदारोळ…
बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी म. ए. समितीवर टीका करण्याच्या भरात पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱयांचाही उल्लेख केला. आपल्या देशात राष्ट्रध्वज पेटविण्याचे प्रकार घडतात. देशासाठी बलिदान दिलेल्या सेनाधिकाऱयांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर त्यांचा अवमान करणाऱया पोस्ट व्हायरल केल्या जातात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. समाजात फूट पाडण्यासाठी असे षड्यंत्र सुरू आहे. पाकचा उदो उदो करणाऱयांचाही विचार करण्याची गरज आहे. भारतच एकसंध राहिला नाही तर कन्नड व मराठी कुठे राहणार आहेत? हिंदीला विरोध केला जातो. मात्र, उर्दू जोरात चालवली जाते, असा उल्लेख त्यांनी करताच काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतला. उर्दूचा उल्लेख इतिवृत्तातून काढण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आपण चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळे इतिवृत्तातून एक शब्दही हटवू नये, अशी मागणी बसनगौडा यांनी केली.
विधानपरिषदमध्येही म.ए.समितीचीच चर्चा : उत्तर कर्नाटकच्या विकासाचे गांभीर्यच हरवले
बेळगावमध्ये कोणतीही घटना घडली की त्याला म. ए. समितीच जबाबदार असे कन्नड वृत्तवाहिन्या आणि माध्यमांचे प्रतिनिधी वृत्त प्रसिद्ध करतात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे दाखविण्याऐवजी कन्नड माध्यमांच्या सर्व वृत्तपत्रांमधून म. ए. समितीला टार्गेट केले जाते. ती वृत्तपत्रे वाचून या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेत म. ए. समितीविषयीच चर्चा झाली. उत्तर कर्नाटक विकासाबाबत एक चक्कार शब्दही एकाही सदस्याने बोलला नाही. हे उत्तर कर्नाटकवासियांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
म. ए. समितीचे सर्वजण गुंड आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी विधानपरिषदच्या सभागृहामध्ये दुपारच्या सत्रामध्ये करण्यात आली. वास्तविक सकाळच्या सत्रामध्ये भ्रष्ट मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन धरले. मात्र बेंगळूरहून आलेल्या काही संघटनांनी बेळगावात आंदोलन करून म. ए. समितीविरोधात गरळ ओकली. त्याचे पडसाद दुपारच्या सत्रात विधानपरिषदेत उमटले. म. ए. समितीविरोधात विधानपरिषदमधील सर्वच सदस्य एकत्र आले. भ्रष्टाचार केलेल्या मंत्र्यांच्या नावाच्या चर्चेला बगल दिली आणि केवळ म. ए. समितीविरोधात बहुसंख्य विधानपरिषद सदस्यांनी गरळ ओकली. वास्तविक वस्तुस्थिती काय आहे, याची कोणतीच माहिती या सदस्यांना नव्हती. कारण बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला आहे तर महाराष्ट्रात अनधिकृत असलेल्या लाल-पिवळय़ा ध्वजाचा अवमान झाला आहे. असे असताना येथील म. ए. समितीला दोषी धरण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला आहे. मराठी भाषिकांची भीती बाळगूनच विधानपरिषदमध्ये ही जोरदार चर्चा झाली. सकाळी सभागृह तहकूब केल्यानंतर दुपारीदेखील भ्रष्टाचारविरोधातच काँग्रेसचे सदस्य पुन्हा धरणे धरण्याच्या तयारीत होते. मात्र सभापतींच्या कक्षामध्ये बैठक घेऊन बेंगळूरहून आलेल्या संघटनांना शांत करण्यासाठी सभागृहात चर्चा करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सभागृहात नाटय़मय चर्चा घडवून आणण्यात आली.
विधानपरिषद सदस्य श्रीकंठेगौडा यांनी बेळगावमधील म. ए. समितीचे सर्वजण आमचे पाणी पितात. आमची वीज वापरतात. मात्र आमच्या विरोधातच ते आंदोलन करत आहेत. अधिवेशनाला विरोध म्हणून महामेळावा भरवितात, हे योग्य नाही. अशा गुंडांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र त्यांना येथील इतिहासच माहिती नसल्याचे दिसून आले. कारण ही भूमी महाराष्ट्राची असून कर्नाटकने हिसकावून घेतली आहे. याचा अभ्यास त्यांना माहिती नसल्याचे दिसून आले. येथील जनतेकडून कर घेऊन वीज, पाणी आणि इतर सुविधा देत असतात, याचादेखील त्यांना विसर झाल्याचे दिसून आले. सभागृहाचे विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनीही म. ए. समितीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गरळ ओकली. कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. दुपारच्या सत्रामध्ये केवळ धरणे आंदोलन धरण्याचे नाटक करून काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी म. ए. समितीवर गरळ ओकली. याचबरोबर भाजपच्या सर्वच सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. सभापती बसवराज होरट्टी यांनीही यावर सरकारने गांभीर्याने चर्चा करून योग्य कारवाई करण्याची सूचना केली आहे. वास्तविक अधिवेशनामध्ये कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह सकाळच्या सत्रात धरण्यात आला. मात्र त्यानंतर गुप्त बैठक घेऊन केवळ म. ए. समितीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आहे. एकूणच येथील अधिवेशन म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याचा प्रकार असल्याचे सोमवारी दिसून आले. विकासाबाबत कोणीच बोलत नाही. केवळ म. ए. समिती विरोधातच गरळ ओकण्यासाठी अधिवेशन भरविल्याचा प्रकार सध्या तरी दिसून येत आहे.