प्रतिनिधी/ चिपळूण
तिवरेतील धरणग्रस्तांचे अलोरे येथे पुनर्वसन करताना 24 घरांचे लोकार्पण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र या घरांना अजूनही पाणी उपलब्ध नसल्याने गावभर भटकंती करण्याबरोबरच पावसाचे पाणी साठवून ते गरम करून पित आले आहेत. मात्र आता पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने आणि पाणी मिळेनासे झाल्याने हे प्रकल्पग्रस्त पावसालाच ‘येरे येरे पावसा…’ असे म्हणू लागले आहेत.
तिवरे धरणफुटी दुर्घटनेनंतर दोन वर्षांनी तेथील बाधित कुटुंबियांच्या पुनवर्सनाचा प्रश्न सुटला. मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने 5 कोटीचा निधी दिल्यानंतर बांधकाम विभागाने 3 कोटी 80 लाख रूपये खर्चून त्यातून 24 घरे उभारली. प्रारंभी गावातच करण्यात आलेल्या कंटेनर केबिनमधील तात्पुरत्या पुनर्वसनानंतर 2 जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते या घरांचा लोकार्पण सोहळा झाला. 24 घरे असली तरी सुरूवातीला 12 आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये उर्वरीत 12 घरांचा ताबा प्रकल्पग्रस्तांना दिला. मुळातच घरांची कामे अर्धवट असतानाच 2 जुलैचा मुहूर्त साधण्यासाठी घाईगडबडीत लोकार्पण सोहळा उरकण्यात आला. यावरून बराच गदारोळ माजला होता.
पुनर्वसन केल्यानंतर गळकी घरे आणि सोयीसुविधा उपलब्ध नसल्याबाबत नेहमीच ओरड सुरू होती. अशातच आता तेथील घरांच्या पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे. जुलैमध्ये घरांचे लाकार्पण झाल्यानंतरही आजतागायत तेथील पाण्याची कोणतीच व्यवस्था प्रशासकीय यंत्रणा आणि लोकार्पणासाठी पुढाकार घेणाऱयांना करता आलेली नाही. परिणामी अख्खा पावसाळा तेथील कुटुंबांनी पावसाच्या पाण्यावर काढला आहे. तेथून 1 कि. मी. अंतरावर असणाऱया विहिरीतून त्यांना पाणी आणावे लागते. मात्र अंतर जास्त असल्याने शक्यतो पावसाचेच पाणी साठवून ठेवून नंतर ते गरम करून आतापर्यंत पित होते. त्यासाठी प्रत्येक घरासमोर पाण्याचे पिंप पावसाचे पाणी साठवण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
पावसाच्या पाण्यावर आतापर्यंत व्यवस्था झाली. मात्र आता पावसाचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे या कुटुंबांची पाण्यासाठीची तडफड वाढू लागली आहे. एकीकडे पाऊस आता नको म्हणून सर्वत्र प्रार्थना केली जात असतानाच पुनर्वसीत कुटुंबे मात्र दररोज पाऊस हवा म्हणून प्रार्थना करू लागले आहेत. या 24 घरांसाठी पाणी योजना यापूर्वीच मंजूर झाली आहे. कामही ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र अजूनही ठेकेदाराने कामाला सुरूवात केलेली नाही. मात्र याकडे कोणीही अधिकारी अथवा लोकार्पणात मिरवणारे लक्ष देताना दिसत नाहीत.
पाण्याची तत्काळ व्यवस्था करण्याच्या सूचना
दरम्यान, पाण्यासंदर्भात या कुटुंबांनी सोमवारी उपसभापती प्रताप शिंदे, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडत निवेदन दिले. यावेळी उपसभापती शिंदे यानी तेथील प्रकल्प अधिकारी, पाणी पुरवठय़ाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत लक्ष देण्याचे सांगतानाच ठेकेदारालाही काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या. मात्र तोपर्यंत या कुटुंबांच्या पाण्याची तत्काळ व्यवस्था करा असे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले.
या निवेदनावर तानाजी चव्हाण, अशोक तांबट, विक्रांत धाडवे, शिवाजी चव्हाण, तुकाराम चव्हाण, तुकाराम कनावजे, बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, नारायण गायकवाड, संजय गायकवाड, भगवान धाडवे यांच्यासह एकूण 16जणांच्या स्वाक्षऱया आहेत.