प्रतिनिधी/ रत्नागिरी
वातावरणातील चढ उताराने आधीच कोकणवासियांच्या नाकीनऊ आणले असताना आता पुन्हा हवामान विभागाच्यावतीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांना अवकाळी पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार 5 ते 6 एप्रिलला कोकणात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 7 व 8 एप्रिलला कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागनुसार, सध्या श्रीलंकेत तसेच कोमोरिन प्रदेशात (तामिळनाडू) समुद्रसपाटीपासून 1.5 उंचीवर सक्रिय हवेची स्थिती आहे. पुढील 48 तासांत परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.
चौकटः –
रविवारी 3 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शहरपरिसर व आसपासच्या परिसरात जून महिन्याप्रमाणे विजांच्या लखलखाटासह व मेघजर्जनेसह पावसाचा शिडकाव झाला. पाली व हातखंबा परिसरात अर्धा तास मोठा पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला असला तरी सध्या शहरात आंब्याची काढणी सुरु आहे. मात्र अवकाळीच्या बरसण्याचा परिणाम आंब्याच्या एकूण प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे.