पुलाची शिरोली / वार्ताहर
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नदीकाठच्या संपूर्ण पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. सभासद शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा कारखाना पुरबाधीत सभासद शेतकऱ्यांना छत्रपती राजाराम साखर कारखाना क्रेडीटवर ऊस बियाणे देणार आहे. अशी माहिती कारखान्याचे जेष्ठ संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली.
कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे जीवनमान ऊस या नगदी पिकावर अवलंबुन आहे. परंतू संपूर्ण ऊस पिक बाधित झाल्यामुळे काढून टाकण्याशिवाय अन्य पर्याय त्यांच्यापुढे उरलेला नाही. नदीकाठच्या कारखान्याच्या अशा सभासद शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. जे सभासद बाधित ऊस पिक काढून त्याच क्षेत्रात ऊसाची पूर्नलागण करणेकरीता इच्छुक अशा सभासद शेतकऱ्यांना कमाल १ एक्कर मर्यादीत क्षेत्राकरीता क्रेडिटवर को- ८६०३२, ९२००५, १०००१, ९०५७, ८००५, ३१०२ या जातीचे ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी दिली.
तसेच मागील वर्षातील कोरोना परिस्थिती व पुरस्थिती याचा विचार करुन संचालक मंडळाने सर्वच सभासदांना प्रति शेअर्स ५ किलो सवलतीच्या दरातील साखर देण्याचा निर्णय देखील घेतला असून कारखान्यामार्फत सुरु असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती पत्रकाव्दारे देणेचे काम शेती विभागामार्फत सुरु असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना माहितीसह मास्क किटचे वाटप देखील सर्व सभासदांना केले जात आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक तसेच सर्व संचालक व कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस उपस्थित होते.