काश्मीरमध्ये अटक केलेल्या पोलीस अधिकाऱयावरून वाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपल्या सरकारी गाडीतून दहशतवाद्यांची ने आण करणारा आणि सध्या अटकेत असणारा काश्मीरातील पोलीस अधिकारी दविंदरसिंग यानेच पुलवामा हत्याकांड घडविणाऱया दहशतवाद्यांना साहाय्य केले असले पाहिजे, असा गंभीर आरोप काँगेसने केला आहे. दविंदरसिंग याला केंद्रीय सत्ताधाऱयांचीच फूस होती, असाही अप्रत्यक्ष आरोप या पक्षाचा आहे. मात्र, भाजपने या दोन्ही आरोपांचा इन्कार केला असून पुलवामा हत्याकांड घडले त्याच्यापूर्वीच दोन महिने दविंदर याची पुलवामा येथून बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा पुलवामा हत्याकांडाशी संबंध जोडणे आणि त्यावरून केंद्र सरकारवर संशय करणे हे हस्यास्पद आणि असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
दविंदर याला तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याने 12 लाख रूपयांच्या मोबदल्यात दोन दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून दिल्लीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो दहशतवाद्यांसह पकडला गेला होता. त्याचे नाव सिंग ऐवजी खान असते तर संघ परिवार व भाजपने आकाशपाताळ एक केले असते, असा आरोप काँगेस कडून करण्यात आला होता. शिवाय अशाच व्यक्तींकडून पुलवामा येथे सैनिकांचे हत्याकांड घडविण्यासाठी केंद्र सरकारच्या संमतीने दहशतवादी आणण्यात आले, असाही सनसनाटी आरोप अप्रत्यक्षरित्या काँगेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता आणि दविंदरचे पुलवामा कनेक्शन तपासण्याची मागणी केली होती.
तथापि, पुलवामा घडण्यापूर्वीच दोन महिने आधी दविंदरची बदली पुलवामाहून करण्यात आली होती, हे जम्मू-काश्मीर पोलीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे दविंदर व केंद्र सरकार यांचा पुलवामाशी संबंध जोडणे हा केवळ कल्पनाविलास आहे, असे सरकारने म्हटले आहे. दविंदर हा केंद्र सरकारचाच हस्तक असता तर त्याला केंद्राच्याच पोलीसांनी अटक कशी केली असती, असा प्रतिप्रश्नही विचारला आहे.