पुलाची शिरोली / वार्ताहर:
येथील आठवडी बाजारात मोबाईल व पाकीट चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. याचा शिरोली एमआयडीसी पोलिसांनी बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरीकांच्यातून विशेषतः महिला वर्गातून होत आहे.
शिरोली गावाची लोकसंख्या व नवनवीन उपनगरांचा वाढलेला विस्तार पाहून ग्रामपंचायत सदस्यांनी तीन ठिकाणी आठवडा बाजार सुरू केला आहे. यामध्ये बिरदेव मंदिरासमोरील दसरा मैदान, छत्रपती शिवाजी नगर व लालबहादूर शास्त्री नगर चौक या ठिकाणांचा समावेश आहे.
बुधवारी छत्रपती शिवाजी नगर येथील बाजारात के.डी. साळुंखे यांचा सुमारे पस्तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल व अन्य एकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे. तर एका महिलेचे पाकीट चोरुन काही रक्कम लंपास केली आहे. अशाच चोरीच्या घटना शनिवारी व सोमवारी भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे बाजारात येणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नागरीकांचे आर्थीक नुकसान होवू लागले आहे. तरी शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पोलिस गस्त सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून विशेषतः महिला वर्गातून होत आहे.