प्रतिनिधी/ सांगे
सांगे हा तालुका खनिज संपत्तीने भरलेला असून सरकारच्या तिजोरीत भरमसाठी निधी प्राप्त करून देत होता. मग तो निधी खनिज, शेती, वन किव्हा साळावलीच्या पाण्याच्या माध्यमातून असो. असे असताना सरकार सांगेच्या विकासावर दुजाभाव का करते. खनिजाचे ट्रक बँण्डवाडा – सांगे या पुला वरून धावत होते. सरकारला करोडो रुपयांचा महसूल मिळाला, असे असताना पर्यायी पुलाच्या कामासाठी सरकारकडे पैसे नाहीत काय ? सरकार का म्हणून पूलाचे काम पुढे नेण्यास मागेपुढे होत आहे. खाणीच्या महसुलातून सरकारने जो पैसा कमविला, त्यातून 19 कोटी रुपये पुलाच्या बांधकामासाठी सहजरित्या खर्च करून पुलाचे बांधकाम पूर्ण करता येते. तरीसुध्दा सरकारने सांगेकराच्या जखमेवर मीठ चोळू नये. पुलाच्या कामाला निधी उपलब्ध करून त्वरित काम सुरू करावे अशी मागणी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मगो पक्षाचे सांगे गटाध्यक्ष दत्तप्रसाद सांगेकर यांनी केली आहे.
यावेळी भाटी ग्रामपंचायतीचे पंच रुपेश गावकर, मंगेश देविदास, प्रवीण नाईक, श्री देसाई हजर होते.
सांगे-बॅन्डवाडा येथे पोर्तुगीज कालीन हा पुल कुडचडे आणि सांगे शहरांना जोडण्यास महत्वाचा दुवा आहे. या पुलावरून मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होत असून खनिजाची वाहतूक चालू असताना कोंडी व्हायची. हा पुल म्हणजे सांगेवासीयांची जीवन दाहिनी झाल्याने जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यास हाती घेतले होते. पण, कोरोना महामारीमुळे हे काम बंद पडले, ते अध्याप सुरूच झाले नाही. मात्र कंत्राटदाराला सरकारने पैसे न चुकते केल्याने तो समान घेऊन परतीच्या वाटेला लागला आहे. या पुलाचे काही विपरीत घडल्यास अन्य पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जातीने लक्ष घालून पुलाचे काम त्वरित चालू होणे गरजेचे आहे असे श्री सांगेकर यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाला होता. काम सुरू झाल्यानंतर नेटाने चालू होते. मात्र, कोरोनामुळे बंद पडले, त्यानंतर मजूर व कामगार गावी गेले ते आलेच नाही. कंत्राटदार पैसे न मिळाल्याने काम सुरू करण्यास राजी नाही. त्यातच सामान घेऊन गेला आहे. त्यामुळे पूल होणार की नाही अशी भिती जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे श्री सांगेकर म्हणाले. सरकारने सांगेतील विकासाची कामे पुढे न्यावी त्यात राजकारण आणू नये अशी मागणी ही त्यांनी केली.
गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नंतर सांगेचा हवा तसा विकास झाला नाही. अनेक सरकारे आली आणि गेली. आमदार बदलले, पण सांगेकडे दुर्लक्षच होत आहे असा सूर यावेळी व्यक्त झाला. सरकारने तातडीने बंद असलेल्या पुलाचे काम सुरू करण्याची मागणी सांगे मतदारसंघ मगो पक्षाने केली आहे.
बॅन्डवाडा येथील पूल अत्यंत महत्त्वाचा असून त्याचे बंद पडलेले काम त्वरित चालू होणे गरजेचे आहे असे मंगेश देविदास यांनी सांगितले. सरकारने राजकारण न करता जे प्रकल्प सांगेसाठी मंजूर केले आहेत, ते मार्गी लावावे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने सांगेचा विकास पुढे न्यावा अशी मागणी करण्यात आली. सांगेतील जनतेवर सरकारने अन्याय करू नये, किती काळ म्हणून हा अन्याय सहन करावा असा प्रश्न श्री. देविदास यांनी केला. सरकारने आम्हाला फक्त पोकळ आश्वासने दिली आहेत, ती बंद करून सांगेचा विकास पुढे न्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.