अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, जे ब्राह्मण सदैव ईश्वर स्मरणात राहून निर्लोभी असतात ते मला पुज्यनिय आहेत. नित्य ब्राह्मण पूजनाचा नेम ज्याचा आहे, तो भाग्यवंतात भाग्यवान होय. पण असा भक्त दुर्मीळ असतो. जो निरनिराळय़ा देवतांची उपासना न करता जीवाभावाने ब्राह्मणाचाच भक्त होतो, त्याचा अनर्थ चुकवून मी त्याचा स्वार्थ यशस्वी करून देतो. ब्राह्मणसेवेमध्ये मला अलौकिक व अनिवार सुख वाटते. ब्राह्मणाला भोजन प्रिय असते आणि सर्व दानांमध्ये अन्नदान श्रे÷ आहे. म्हणून उत्तम उत्तम पक्वान्ने तयार करून ब्राह्मण हे माझेच स्वरूप आहेत अशा भावनेने त्यांना भोजन द्यावे. कोणी ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना अन्न देतात, कोणी भोजन देण्याच्या दगदगीला कंटाळून देतात, कोणी निर्भत्सना करून भोजन घालतात आणि कोणी तर वसावसा अंगावर ओरडून जेवावयास घालतात. पण तसे करू नये. ब्राह्मण हे माझे स्वरूप आहेत हे लक्षात ठेव. त्यांचा आदरसत्कार करून त्यांना यथाशक्ति भोजन घालावे. वेळेला एखादा अज्ञानी अतिथि आला, तर तोही माझे स्वरूपच असतो, याकरता त्याला त्यावेळी अन्न घालावे. अतिथि विन्मुख गेला असता त्याच्याबरोबर आपले सर्व पुण्यही जाते, म्हणून त्याला वेळीच आवश्य अन्न द्यावे. निदान पाणी तरी प्यायला द्यावे ब्राह्मणसेवेला काया, वाचा, मन, धन लावणे व यथाशक्ति निष्कपटभाव धरणे ह्याचेच नांव अतिथिपूजन. ब्राह्मण हे माझेच स्वरूप होत असे समज आणि म्हणूनच माझ्या पूजेचे श्रे÷ अधि÷ानही तेच आहेत. ब्राह्मणाची सेवा द्रव्याशिवाय मुळीच घडत नाही असे मात्र म्हणू नये. श्रद्धा आणि भजन करण्याचा पूर्ण उल्हास हीच मुख्य साधने होत. ब्राह्मणाच्या भक्तीसाठी अंतःकरण आनंदाने भरून जाणे आणि परमश्रद्धेने व उल्हासाने परिपूर्ण असणे ह्याचे नाव ‘आतिथ्य’. याप्रमाणे ब्राह्मणाचे भजन हे माझ्या पूजेचं तिसरं अधिष्ठन आहे. आता गायत्रीसेवा ऐक. गाईच्या कैवाराने मी परशुरामावतारात सहस्रार्जुनाला मारून ठार केले आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील मुख्य लढवय्ये असे क्षत्रिय मी मारले. रामावतारात माझे माहात्म्य फार मोठे होते पण त्यात गाईची सेवा घडली नाही म्हणून मी गोकुळात अवतार घेऊन गाईची सेवा केली. गाईच्या सेवेनेच मला पुष्टता प्राप्त झाली म्हणूनच लहानपणी मोठमोठे मल्ल मी मारून टाकले. कंस, चाणूर, ह्यांसारखे अदम्य मल्ल मारले व उग्रसेनाला राज्यावर बसवले. गाईच्या सेवेची आवड मला फार आहे. त्यामुळेच माझी एवढी पवित्र कीर्ति पसरली. मी कंसाच्या राज्यातले बंदिखाने फोडले आणि पितरांची बेडी काढून त्यांना मुक्त केले. म्हणून गाय आणि ब्राह्मण हे माझे जीवप्राण आहेत. ह्या दोहोमुळेच माझ्या पूजेचे अधिष्ठान सुलभ झाले आहे. जो आपत्कालात गाईचे संरक्षण करतो, तो मला फार आवडतो. त्याच्याबरोबर मीही स्वतः गोरक्षण करू लागतो. गाईच्या सेवेचे विधान असे आहे की, तिला दररोज गोग्रास द्यावा व गवत घालावे आणि तिच्या आंगावरून हात फिरवून तिचे अंग कुरवाळावे, म्हणजे तेव्हढय़ानेच मी प्रसन्न होतो. उद्धवा ! निर्लोभीपणाने गाईची सेवा केली असता माझी प्राप्ती होते. आता सद्भक्तीने वैष्णवाची पूजा कशी करावी तेही ऐक. वैष्णवाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. तेथे जात हे प्रमाण नाही. भक्तिप्रधान भावार्थाने हा शुद्ध आहे किंवा हा ब्राह्मण आहे असा भेद मनातच आणू नये. विदुर हा दासीपुत्र असल्याचे प्रसिद्धच आहे. पण त्याला श्रीकृष्ण आवडला. तो वैष्णवांमध्ये अत्यंत श्रे÷ झाला. माकडाच्या जातीत जन्माला आलेला मारुती, वैष्णवांमध्ये अत्यंत श्रे÷ होता. तो कनिष्ठ आहे असे म्हणण्याइतका पातकी कोण आहे? राक्षसांमध्ये विभीषण व दैत्यांमध्ये प्रल्हाद, हेही भगवंताला अनन्यभावाने शरण गेले, म्हणून त्या योगाने त्यांना वैष्णवपण प्राप्त झाले. जातीने श्रे÷ असून जर भक्तिरहित असेल तर तो वैष्णव नव्हे हे लक्षात ठेव. किंवा वरकरणी भजन करील तर त्यालाही वैष्णवपणा प्राप्त झाला नाही असे समजावे. जो वैष्णवांमध्ये जाति प्रमाण मानतो, गुरूला सामान्य मनुष्य समजतो, तो सर्वस्वी पातकी होय.
क्रमशः