पटना / वृत्तसंस्था
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीसाठी संसदेत गोंधळ सुरू असतानाच आता एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या संजदनेही चौकशीचा आग्रह व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच पेगॅसस हेरगिरी प्रकरणात चौकशी होऊन सगळय़ा गोष्टी लोकांपुढे येणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. नितीशकुमार यांचा पक्ष भाजपप्रणित एनडीए आघाडीचा पक्ष आहे. या प्रकरणात विरोधकांच्या मागणीशी सहमती दर्शवणारे नितीशकुमार हे घटक पक्षांचे पहिले नेते ठरले आहेत. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे विरोधकांना आणखी बळ मिळाले आहे. कोणालाही त्रास देण्यासाठी अशा प्रकारची हेरगिरी करणे योग्य नाही. याबाबत जे काही घडले आहे ते लोकांपुढे आले पाहिजे, असे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.