निव्वळ तोटय़ाच्या प्रमाणात वाढ – समभागावरही बाजारात दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच पेटीएमचे तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या अंतर्गत कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीअखेर महसुलामध्ये 64 टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. देवाणघेवाणीच्या व्यवहारात झालेल्या वाढीमुळे महसुलामध्ये वरील वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र तोटा मात्र दुसरीकडे आणखी वाढला आहे.
कंपनीचा महसूल 842 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पण याच दरम्यान सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीअखेर तोटय़ामध्ये मात्र वाढच दिसली आहे. सप्टेंबर तिमाही अखेर कंपनीने 474 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला आहे. एक वर्षाआधी समान कालावधीत कंपनीने 437 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा प्राप्त केला होता. पेटीएम 18 नोव्हेंबरला शेअर बाजारामध्ये लिस्टिंग झाली होती. लिस्टिंग झाल्यानंतर पेटीएमच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
समभाग नुकसानीत
दरम्यान सोमवारी सकाळी पेटीएमच्या समभागांमध्ये 4.6 टक्के इतकी घसरण दिसली. सकाळी 10.40 वाजता एनएसईवर समभाग 0.22 टक्के घसरणीसह 1778 रुपयांवर होता. तर सेन्सेक्समध्येही हा समभाग 0.23 टक्के घसरणीत होता. दुसऱया तिमाहीच्या निकालात कंपनीचा तोटा वाढल्याच्या कारणास्तव कंपनीचे समभाग नुकसानीत होते.