प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील अशियायी महामार्गावर पेठनाका येथे उभ्या असलेल्या ट्रकला पावलो कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून धडक देवून झालेल्या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
सिलवेस्टर लायेनेल पेरीया (२४ रा. बोरवली, मुंबई), अनिकेत अंबादास परळे (२५ रा. कर्जत), दिपक निशाद (२९ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. मुंबई), एसीओ रिकार्डो फर्नांडिस (गोवा), अविनाश घाडगे (शिरोली), सुनिल छोटेलाल यादव (कुर्ला), शकील इस्माईल सुरती, महेंद्र गुप्ता, सुजाता धारप, शरद मधुसूदन धारप (दोघे रा. अलिबाग), अमोल दिपक पवार (डोबिवली) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
ट्रक चालक दता आत्माराम बडे हे (ट्रक क्र. एम.एच०९ सी.डब्ल्यू ४७२५) मधून निपाणी येथून साखर पोती घेवून पनवेलच्या दिशेने निघाले होते. दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते पेठनाका येथे आले. उड्डाण पूल ओलांडून पुढे येवून ट्रकचालक दत्ता बडे व सहचालक रामा बडे हे ट्रक महामार्गाच्या बाजूला उभा करून लघुशंकेसाठी उतरले. ते ट्रककडे परत येत असताना कोल्हापूर कडून आलेल्या पावलो कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक जी.ए०७ एफ ७०७७) ने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी ट्रक चालक बडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.