साहाय्यक निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त जगदीश के.एच. यांनी दिल्या विविध सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बैठका आणि प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघांतील सेक्टर ऑफिसरना कामाच्या जबाबदाऱयांची माहिती देण्यासाठी गुरुवारी महापालिका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामकाजाबाबतचे प्रशिक्षण साहाय्यक निवडणूक अधिकारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिले.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध तयारी करण्यात येत आहे. अधिकाऱयांना निवडणुकीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापूर्वी सेक्टर अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुसऱया टप्प्यातील प्रशिक्षण देऊन अधिकाऱयांना कामाची जाणीव करून देण्यात आली. यावेळी निवडणूक प्रक्रिया व मतदान प्रक्रिया याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी साहाय्यक निवडणूक अधिकारी या नात्याने दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सूचना नागरिकांना व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे. तरीदेखील नजर ठेवणे बंधनकारक आहे.
सभा-समारंभ किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी राजकीय व्यक्तींचा समावेश असल्यास तातडीने कारवाई करावी, अशा सूचना करण्यात आल्या. आचारसंहितेच्या चौकटीत सभा-समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत का? यावर व्यवस्थित नजर ठेवावी, अशा विविध सूचना महापालिका आयुक्तांनी सेक्टर अधिकाऱयांना दिल्या.
ओल्या पाटर्य़ा किंवा मतदारांना आमिष दाखविण्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ सूचना करावी. प्रत्येक कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, असे सांगितले. सेक्टर अधिकाऱयांच्या जबाबदाऱयांची माहिती घेण्यात आली. यावेळी विविध विभागातील सेक्टर अधिकारी उपस्थित होते.
पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी एक अर्ज दाखल
बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी एक अर्ज दाखल झाला असून आतापर्यंत एकूण तीन अर्ज दाखल झाले आहेत. 17 एप्रिल रोजी ही निवडणूक होत असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 मार्च आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी अर्ज दाखल होणार आहेत.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल किरण देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी ते आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. येत्या चार दिवसांमध्ये भाजप, काँग्रेस यासह इतर पक्षांचे अर्जही दाखल होणार आहेत. लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवार दि. 30 मार्च आहे. त्यानंतर 31 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 3 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारी वेंकटेश्वर महास्वामीजी आणि श्रीकांत पडसलगी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आता आणखी एक अर्ज दाखल झाला आहे.