तालिबान सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानची स्थिती अधिकाधिक दयनीय होत आहे. देशात अन्नाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय रोजगारांची कमतरता आणि आर्थिक डबघाईमुळे आलेली विपन्नावस्था या देशाचा सर्वनाश करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही युरोपियन पत्रकारांनी या स्थितीचे पुरावे जगासमोर आणले असून ते हृदयाला पाझर फोडणारे आहेत.
साधारण साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील लाखो पालकांवर पोटची मुले विकून पोट भरण्याची वेळ आलेली आहे. आर्थिक समस्या असताना घरातील एखादी वस्तू विकावी त्याप्रमाणे हे आईवडील बाजारात आपल्या मुलांना विकत आहेत. आठ-दहा वर्षांच्या कोवळय़ा मुलींची विक्री प्रौढ वयाच्या पुरुषांना होत आहे. मुलांच्या भरणपोषणासाठीही पैसा नसल्याने असे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे अनेक पालक सांगताना दिसतात. मुलांचे अक्षरशः लिलाव केले जातात. जो अधिक किंमत देईल, त्याला मूल विकले जाते. तो कोण आहे, मुलाचा सांभाळ व्यवस्थित करेल की नाही, विकत घेतल्यानंतर या मुलाचा किंवा मुलीचा उपयोग कशासाठी केला जाईल, याची कोणतीही काळजी न करता केवळ स्वतःची जबाबदारी दूर व्हावी, यासाठी पालक हे व्यवहार करीत आहेत. तालिबान सरकारनेही याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तालिबानचे प्रशासन आल्यानंतर लाखो लोकांना रोजगार गमवावे लागले. त्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.