स्वतःच्या खर्चातून केले मोफत धान्य वाटप : मित्रांकडूनही मिळवून दिली मोठी मदत
प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील मोटरसायकल पायलट व रिक्षावाचालकांसाठी पोलीस निरीक्षक दत्तगुरु सांवत यांनी आपल्यापरिने आधार देण्याचा प्रयत्न केला. अनेक मोटरसायकल पायलट व रिक्षाचालकांना त्यांनी स्वखर्चाने मदत केली आहे. त्यांच्या काही मित्रांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याने अन्य काही पायलट व रिक्षचालकांनाही त्यांनी मदत मिळवून दिली.
आत्तापर्यंत सावंत व त्यांच्या मित्रांनी सुमारे 474 रिक्षाचालक व मोटरसायकल पायलटांना लॉकडाऊनच्या काळात सहकार्य केले आहे. सावंत यांच्या कार्याने प्रोत्साहीत होऊन वास्को, पेडणे येथील मोटरसायकल पायलट व रिक्षाचालकानाही काही समाजसेवकांनी सहकार्य केले आहे.
पायलट, रिक्षाचालकांकडे अनेकांचे दुर्लक्ष
राज्यात 25 मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. गोव्यात अडकून राहिलेल्या अनेक परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती. हे कामगार रोजंदारीवर काम करीत होते. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांचा चरितार्थ कसा होणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थिता झाला. यावेळी अनेक सामाजिक संस्थानी तसेच समाजसेवकांनी, सरकारनेही त्यांना मदतीचा हात पुढे केला. सरकारने काही कामगारांची जेवण, निवासाची व्यवस्था केली होती. मात्र मोटरसायकल पायलट, रिक्षाचालकांकडे कुणी फारसे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले आहे.
आपल्याकडून शक्य ते करण्याचा प्रयत्न
लॉकडाऊनमुळे उपासमारीची पाळी केवळ बिगरगोमंतकीय मजुरांवरच आली नव्हती तर राज्यातील मोटरसायकल पायलट तसेच रिक्षाचालकांची स्थितीही बिकट बनली होती. रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांची आणि मोटरसायकल पायलट व रिक्षचालकांची परिस्थिती समान आहे. केवळ रिक्षाचालक व मोटरसायकल पायलटच नव्हे तर त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाचे काय असाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. ते आपापल्या घरात मुग गिळून गप्प होते म्हणून त्यांचा मूक आक्रोश कुणाला दिसत नव्हता. अशावेळी पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी त्यांचा आक्रोश ओळखला. त्यांच्याकडे संपर्क साधून आपल्यापरिने जे काही शक्य होईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
समाजाचे ऋण फेढण्याची हीच वेळ
आपण या समाजाचा एक घटक असून आपल्या समाजासाठी आपणच सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे, कारण आज आपली तशी परिस्थिती आहे. आज ज्यांची स्थिती हालाखिची झाली आहे त्यांना सहकार्य करण्यासाठी आपणच काहीतरी हालचाल केली पाहिजे. समाजाचे आपल्यावर खूप ऋण असते. ते आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने फेढायला पाहिजे असते. हे ऋण पूर्णतः फेढता येत नाही तरीही आपण थोडासा प्रयत्न म्हणून ही मदत करावी असे सावंत यांना वाटले. म्हणून मोटरसायकल पायलट व रिक्षाचालकांना सहकार्य करण्यासाठी निरीक्षक सावंत यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना मदत केली.
वाळपई, साखळी, डिचोलीत धान्याचे वितरण
सावंत त्यांच्या हाताखाली काम करणारे हवालदार दिनेश पिकुळकर, नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, किरण परब व संजय गावकर यांच्या मदतीने वाळपई, साखळी व डिचोली भागातील सुमारे 74 रिक्षाचालकांना व मोटरसायकल पायलटांना चांगल्या दर्जाचे 10 किलो तांदुळ, पाच किलो पीठ, एक किलो तुरडाळ, एक किलो साखर, मसाला पाकिट, बिस्कीटचे पुडे तसेच इतर काही आवश्यक सामान पायलट व रिक्षाचलकांना देण्यात आले.
पणजीतील पायलटांनाही मिळवून दिली मदत
निरीक्षक सावंत यांच्या कार्याची माहिती पणजीतील मोटरसायकल पायलटांना व रिक्षाचालकांना मिळताच त्यांनीही सावंत यांच्याशी संपर्क साधला. पणजी परिसरात 400 हून अधिक लोक असल्याने हे काम त्यांच्या आटोक्याबाहेरचे होते. मात्र त्यांनी वेगळी युक्ती लढवली. पणजी परिसरातील लोकांनाही सहकार्य मिळवून दिले. निरीक्षक सावंत यांनी केलेल्या कार्याने प्रोत्साहीत झालेल्या काही सुजाण समाज सेवकांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनाही मदत करायची असल्याची इच्छा प्रगट केली होती, निरीक्षक सावंत यांनी त्या लोकांची व पणजीतील रिक्षाचालक व मोटरसायकल पायलटांची गाठ घालून दिली. त्यामुळे पणजी परिसरातीलही पायलट व रिक्षाचालकांनाही मदत झाली आहे. सावंत यांच्या प्रयत्नामुळे अन्य भागांतील काही समाजसेवकांनी त्या त्या भागांतील पायलट व रिक्षाचालकांना मदत मिळवून दिली आहे.