प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणुची लागण झालेले तीन रूग्ण शहर आणि ग्रामीण भागात आढळल्याने खबरदारी घेण्यात आली आहे. याकरिता विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक रहदारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बॅरीकेड्सची कमतरता भासत असल्याने भाडेतत्वावर बॅरिकेड्स घेऊन विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.
विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या 15 दिवसापासून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. शहरात येणाऱया प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यास मदत झाली आहे. पण शहर आणि ग्रामीण भागात कोरोना विषाणुची लागण झालेले तीन रूग्ण आढळल्याने उपाय योजना तिव्र करण्यात आल्या आहेत. तीन पैकी एक रूग्ण कॅम्प परिसरातील असल्याने त्या भागातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच शहरातील विविध भागामध्ये काही नागरिकांना होम क्वॉरंटाईन घोषित करून घरामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर कोरोनाग्रस्तांच्या सहवासात आलेल्या नागरिकांनी विविध ठिकाणी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील बंदोबस्त तिव्र करण्यात आले आहेत. इतका कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून विनाकारण फिरणाऱया वाहनचालकांची वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तरी देखील काही वाहनधारक रस्त्यावर फिरत आहेत. या सर्वांवर निर्बंध घालण्यासाठी प्रत्येक गल्लीच्या कोपऱयावर बॅरिकेड्स लावून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. याकरिता पोलीस प्रशासनाला बॅरिकेड्सची कमतरता भासत आहे. त्यामुळे रस्ते बंद करण्यासाठी भाडेतत्वावर बॅरिकेड्स घेण्याची वेळ आली आहे. रस्ते बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे बॅरिकेड्स कमी पडल्याने 500 बॅरिकेड्स भाडे तत्वावर घेऊन ठिकठिकाणी गल्लीच्या कोपऱयावर लावण्यात आले. धोकादायक परिसर आणि वाहनांची वर्दळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावुन खबरदारी घेण्यात येत आहे.