स्थानिक नागरिकांचा प्रश्न, साखळी कधीच तोडली असल्याचा दावा
प्रतिनिधी/ सातारा
येथील प्रतापगंज पेठेत पहिला रुग्ण 3 मे रोजी आढळून येताच सर्व पेठ त्यावेळी बंद केली. त्या रुग्णाच्या घरातील सर्व प्रशासनाने क्कॉरंटाइन कक्षात विलीनीकरनात ठेवले आहे. पुन्हा प्रशासनाने सूक्ष्म कंटेंटमेंट झोन केला. शुक्रवारी सायंकाळी जे दोन पॉझिटिव्ह आढळून आले ते बाहेरच आहेत. त्यांचा आणि पेठेचा दि. 3 मे पासून सबंध नाही. त्यामुळे साखळी कधीच तुटली असून कंटेंटमेंट झोन कधी उठवणार? असा प्रश्न तेथील स्थानिक करू लागले आहेत.
मुंबईहुन मृतदेह घेऊन आलेल्या त्या युवकास आणि त्याच्या कुटूंबाच्या सदस्यांना प्रशासनाने बाहेरून आल्याचे समजताच नेले होते. त्यातील त्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने तो परिसर सील केला. त्यांच्या नातेवाईकांना नेऊन क्कॉरंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात त्या बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर त्याच्या मावशीचा ही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अर्कशाळा परिसर सील केला होता. त्या तरुणाचे कुटूंबातील सर्व सदस्य हे बाहेर क्कॉरंटाइन कक्षात आहेत. त्यांचा आता दि. 3 मे रोजीपासून सबंध नाही. त्यामुळे त्या दोघांना जरी बाधा झाल्याचे उघडकीस आले असले तरी आता पेठेत काहीच नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे. कंटेंटमेंट झोन असल्याने काही नागरिकांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. घरातील साहित्य संपत आले असून घरात ज्या डाळी होत्या त्यावर गुजराण सुरू आहे.
नगरसेवक फिरकत नाहीत
प्रतापगंज पेठेत सूक्ष्म कंटेंटमेंट झोनमध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, लोकांना खायला मिळते आहे का? त्याना काय समस्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी स्थानिक नागरिक सुद्धा फिरकत नाहीत. केवळ उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हे दोन वेळा आल्याचे सांगण्यात आले.