प्रतिनिधी/ चिपळूण
सिंधुदुर्गचे पालकमंत्री व जिह्याचे प्रतिपालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्येक घरात मास्क आणि सॅनिटायझर वाटपाचा घेतलेला कार्यक्रम हा निव्वळ फार्स असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी सोमवारी केली. यापूर्वी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दिल्या, पण त्या घ्यायच्या कशा तेच सांगितले नाही. त्यामुळे गोळ्या खरेदीचे दरपत्रक जाहीर करावे. ते झाल्यास बऱयाच गोष्टी समोर येणार आहेत.
कृषी सुधारणा विधेयकाबाबत येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अर्सेनिक अल्बमच्या गोळय़ा सर्वत्र वाटण्यात आल्या. मात्र त्यामध्ये कुठेही सुसूत्रता नव्हती. कोरोना घालवण्यासाठी अर्सेनिक अल्बमच्या गोळय़ाच का? आयुष मंत्रालयाने सुचवलेला आयुर्वेदिक काढाही उपयोगी असताना त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? त्यामुळे ज्या विभागाने गोळय़ा वाटप केल्या त्याचे दरपत्रक समोर येणे गरजेचे आहे. गोळय़ानंतर आता पुन्हा मास्क आणि सॅनिटायझर वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र यामुळे नेमके काय होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कामथे रूग्णालयाला जिल्हा कोविड रूग्णालयाचा दर्जा जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केला. मात्र ते त्यांना अधिकार आहेत का? असतील तर मग त्यादृष्टीने रूग्णालयाची काय सुसज्जता केली? रूग्ण खासगी रूग्णालयाकडे वळून कामथे का रिकामे रहातेय? हे आता तपासण्याची वेळ आली आहे. चिपळूणच्या दानशूर व्यक्तीनी सुमारे अर्धा कोटी रूपये खर्चून अत्याधुनिक साहित्य पुरवठा करत हे रूग्णलय सुसज्ज केले. सरकारने एक रूपयाही दिलेला नाही. त्यामुळे आता झालेल्या या कामावर कुणीतरी मोठे होण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातू यांनी केला. सुरूवातीच्या काळात कोरोना रूग्ण याच रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र खासगी रूग्णालयांत कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर हे रूग्णालय रिकामे रहात असल्याबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला.
पालकमंत्र्यांना जिल्हय़ासाठी वेळच नाही!
जिल्हय़ात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. डॉक्टर आणि उपलब्ध कर्मचारीवर्ग आपल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मात्र त्यांना जे सहकार्य सरकार म्हणून हवे ते मिळत नाही. जिह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना तर जिह्याकडे बघायला वेळच नाही. प्रतिपालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाने दोन दिवसांपूर्वी एका ऑनलाईन बैठकीसाठी मला कॉल केला. मुळातच मंत्र्यांकडे जिल्हय़ातील एका माजी आमदाराचा संपर्क क्रमांक नसेल तर त्यांची यंत्रणा काय करत असेल याचा विचारच न केलेला बरा. कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चांगली कामगिरी बजावल्यानंतर त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली. लॉकडाऊनमध्ये जे काम आरोग्य विभागातील यंत्रणा करत होते तेच काम आताच्या मोहिमेतून होत आहे. म्हणजेच काय तर आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीतून मुख्यमंत्र्यांची औषधे वाटली जात असल्याचे सांगत त्यांनी या मोहिमेची खिल्ली उडवली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, रामदास राणे, आशीष खातू आदी उपस्थित होते.
कृषी विधेयकामुळे अमूलाग्र बदल
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱयांच्या दृष्टीने हिताचे आहे. या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात आणि शेतकऱयांमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाकडून या विधेयकाला विरोध होताना दिसत नाही. ज्या युवा संघटनेने या विधेयकाविरोधात आंदोलन केले त्या युवा संघटनेत किती शेतकरी आहेत, असा टोला डॉ. नातू यांनी राष्ट्रवादी युवकला लगावला. या विधेयकामुळे शेतकरी खऱयाअर्थाने आत्मनिर्भर होणार आहे. शेतकऱयांना आपला शेतीमाल कोणालाही विकता येणार आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी होतील, पण अस्तित्व नष्ट होणार नाही. हा कायदा कोकणच्या हिताचा आहे. सत्ताधारी पक्षाचेच लोक या विधेयकाचे समर्थन करत आहेत. यावरूनच या विधेयकाचे महत्व शेतकरी आणि कोकणच्यादृष्टीने अधिक आहे.