प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात अवनी संस्थेच्या माध्यमातून बाल अधिकार मंच स्थापन झाले आहेत. कोरोनामुळे बालकांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गावागावांत बाल संरक्षण समिती स्थापन करावी, अशी मागणी बाल अधिकार मंच आणि अवनी संस्थेने शुक्रवारी जिल्हा महिला, बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
संस्थेने दिलेल्या निवेदनात संस्थेने कचरावेचक कुटुंबांसाठी अभ्यासिका, डे केअर सेंटर, मोबाईल लायब्ररी सुरू केली आहे. वडणगे, फुलेवाडी, राजेंद्रनगर, यादवनगर, मुडशिंगी, रेंदाळ, विचारेमाळ येथे हे उपक्रम सुरू आहेत. बाल अधिकार मंच स्थापन केले आहेत. कोरोनामुळे बालकांवर अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे बालसंरक्षण समिती स्थापन होणे आवश्यक बनले आहे.
प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करावी, या समितींचे सक्षमीकरण करावे, सदस्यांना ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षण द्यावे आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन देताना विजय गोसावी, ज्योती गोसावी, प्रतिक्षा ओव्हाळ, सुप्रिया ओव्हाळ, मेघा पुजारी, अल्निसा गनीभाई, सविता गोसावी, भारती कोळी, प्रशांत गवळी, वनिता कांबळे, अन्नपुर्णा कोगले, आंsंकार व्हटकर, गौतम कांबळे आदी उपस्थित होते.