18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे आजपासून लसीकरण : पाच हजार डोस उपलब्ध
- ऑक्सिजन प्लान्टमध्ये स्फोट न झाल्याचा निर्वाळा
प्रतिनिधी / ओरोस:
ऑनलाईन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण 4 मेपासून सुरू होत आहे. यासाठी पाच हजार डोस उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातील एका केंद्रावरून दर दिवशी केवळ 100 डोस दिले जाणार आहेत. 100 लोकांमध्ये नाव नसलेल्या नागरिकांनी नाहक गर्दी करू नये. यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
सामंत यांनी झूम ऍपच्या माध्यमातून सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लसीकरण व अन्य मुद्दे स्पष्ट केले. जिल्हय़ात आता उपलब्ध झालेली लस ही प्राधान्याने नोंदणी केलेल्या 18 आणि 45 वर्षांखालील नागरिकांना दिली जाणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांनी दुसऱया डोससाठी गर्दी करू नये. उपलब्धतेनुसार जिल्हय़ातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयामधील ऑक्सिजन प्लान्टला आग लागल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी योग्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी प्रशासनाच्यावतीने दिला. सिलिंडर जोडताना एक मोठा आवाज झाला. तो स्फोट नव्हता. कोरोना काळात जिल्हय़ाला पॅनिक करणाऱया बातम्यांचे वार्तांकन सावधगिरीने खात्रीच्या माहितीच्या आधारे करावे. स्फोट झालेला नसताना संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे कौतूक
कोविड रुग्णांची सोय करून बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश मालवणकर यांनी यंत्रणेलाही लाजवेल, अशा प्रकारचे सेंटर उभे केले आहे. शिवाय या संस्थेच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वत:च्या सेंटरबरोबरच शासकीय सेंटरसाठीही उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या मदतीला एक चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी झाली आहे. अशी यंत्रणा उभी केल्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतूक थोडेच असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच अशाच पद्धतीने खासगी स्वरुपात मदत करू इच्छिणाऱया संस्थांना प्रशासनाकडून तात्काळ परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट केले.
होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशनमधील नागरिकांच्या हातावर शिक्के मारण्यासाठी वापरली जाणारी निवडणूक शाई संपली आहे. त्यामुळे पोलिओ डोस किंवा निवडणूक काळात वापरले जाणारे शाईचे पेन या आधारे संबंधितांच्या हाताच्या अंगठय़ावर शाई लावली जाणार आहे. डाव्या अंगठय़ावर शाई असणाऱया नागरिकांनी होम आयसोलेशन, तर उजव्या अंगठय़ावर शाई असलेल्या नागरिक हे बाहेरून आलेले नागरिक असून त्यांना 14 दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक राहणार आहे. अंगठय़ावर शाई असलेली व्यक्ती आरोग्य यंत्रणेच्या परवानगी शिवाय बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आठवडा बाजार भरल्यास कारवाई
आठवडा बाजाराला बंदी असतानाही संबंधित दिवशी काही बाजारपेठांमधून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे अशी गर्दी झाल्यास आणि आठवडा बाजार भरल्याचे निदर्शनास आल्यास ज्या अधिकाऱयाच्या अधिपत्याखाली तो बाजार असेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.