माणसाचे जीवन जेव्हा निसर्गाशी जोडलेले होते तेव्हा त्याचे जिव्हाळय़ाचे भावबंध सूर्य, चंद्र, आकाश, धरतीसह समस्त पशु पक्ष्यांमध्ये गुंतलेले होते. भल्या पहाटे झोपेतून उठवण्याचे काम कोंबडा करीत असे. कोंबडय़ाचा आणि माणसांचा संबंध वेदकालाइतका जुना आहे. तो सूर्याचा मित्र आहे. रथ घेऊन सूर्य पृथ्वीवर यायला निघाला की प्रथम कळते ते कोंबडय़ाला. तो खणखणीत अशी हाक घालतो माणसाला. कुकुचेकु ही लयबद्ध हाक ऐकली की माणसे उठत. झोपून राहत नसत. चाणक्मय म्हणतो, कोंबडय़ापासून युद्ध, पहाटे उठणे, बांधवांसह भोजन आणि संकटात सापडलेल्या स्त्रीचे रक्षण या गोष्टी शिकाव्या. कार्तिकेयाच्या मंदिरावर कोंबडय़ाचे चिन्ह असते. पहाट आणि कोंबडा यांचे अभिन्न नाते आहे. जात्यावर बसून ओवी गाणारी आपली पूर्वज स्त्री म्हणते, रोज पहाटे महादेव, मारुती आणि दत्त हे कोंबडा आरवला की नदीवर स्नानाला जातात आणि शांत झोपलेल्या नदीला हळूच जागे करतात. कोंबडय़ाचे हे ऋण जाणून दत्तगुरूंनी त्याच्या तुऱयावर लाल गुलाल टाकला आणि या सूर्यप्रतिकाला सौंदर्य बहाल केले.
श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक यामध्ये दहा श्लोक हे ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ यावर लिहिले आहेत. समर्थांनी पहाटे रामनाम घेण्याचा आग्रह का धरला? अनंत दामोदर आठवले मनोबोध या ग्रंथात म्हणतात, ‘मनुष्याजवळ असणाऱया अनेक प्रकारच्या मोठमोठय़ा दोषांना घालवणारे श्री रामनाम आहे, म्हणून ते प्रभातकाळी घ्यावे. ज्यामुळे दोषांचे पोषण होईल अशा गोष्टी पहाटे उठून करण्याऐवजी रामनामाचे स्मरण-चिंतन करणे हे सर्व जीवन शुद्ध, निर्मळ होण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त असते.’ पहाटे उठून साधना करण्याचा आग्रह सर्व संतमंडळींनी धरला आहे. निशाचर, विषयी, षड्रिपूधारक मंडळी पहाटे शांत झोपलेली असतात, त्यामुळे त्यांच्या वाईट विचारांचे प्रदूषण वातावरणात नसते. ब्राह्ममुहूर्ती नियमित साधना करणारे साधक, पूजाअर्चा करणारे पंडित, सात्विक विचारांची माणसे उठलेली असतात. त्याची स्पंदने हवेत लहरत असल्यामुळे साधनेसाठी अनुकूल परिस्थिती असते. जप चांगला होतो. दत्तावतारी संत पूजनीय नाना महाराज तराणेकर म्हणत, ‘मन आणि घडय़ाळ एकसारखे असतात. घडय़ाळाला एकदा चावी दिली की ते बिनबोभाट चोवीस तास काम करते, त्याप्रमाणे मनाला रोज थोडी जरी उपासनेची चावी दिली तर दिवसभर आनंद मिळतो.’ पहाटे मनात सुरू झालेले नामस्मरण गती थोडी कमी जास्त झाली तरी सुरू असते. एक ओवी अशी आहे–
सकाळी उठून आदी रामाचं नाम घ्यावं माय धरणीवर, मग पाऊल टाकावं
राम राम म्हनू, राम साखरेचा खडा फाटच्या गं पारी, एक मुखा मंदि सोडा
तोंड गोड करणारा साखरेचा खडा म्हणजे राम. श्रीरामांचे नामस्मरण मनामधल्या व्यथा, चिंता दूर करून मनाला आनंद व प्रसन्नता देते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
‘जयाचेनि नामे महादोष जाती
जयाचेनि नामे गती पाविजेती
जयाचेनि नामे घडे पुण्यसेवा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा’
पहाट म्हटले की आठवते ती भूपाळी. भूप रागात पहाटेच्या वेळी देवाला जागे करण्यासाठी म्हटले जाते ते गीत म्हणजे भूपाळी. पहाट झाली, भगवंता उठा आणि जगाचा उद्धार करा असे संत म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी मारुतीरायांची भूपाळी लिहिली आहे. अंजनी माता हळुवारपणे मारुतीला उठवताना म्हणते, प्रभात झाली, सूर्योदय झाला. राम सिंहासनी बसला आहे आणि तुझ्यावाचून खोळंबला आहे. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव, बिभीषण, जांबुवंत, वशि÷, नारद आणि सगळे वानर तुझी वाट बघत आहेत. अंजनी मातेचे हे बोलणे ऐकून हनुमंत जागा कसा होतो? तर …
‘उठलासे हनुमान प्रेमे टाळिया पिटी’. संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या भूपाळीमधली पहाट ही वेगळी आहे. माणसाला आत्मविस्मृती होते आणि मायेचे पांघरूण घेऊन तो गाढ झोपी जातो तेव्हा त्याला बाह्य नव्हे तर अंतर्यामी जाग यावी लागते. संत नामदेव महाराज म्हणतात,
‘उठा जागे व्हा रे आता। स्मरण करा पंढरीनाथा। भावे चरणी ठेवा माथा। चुकवी व्यथा जन्माच्या।। महाराज म्हणतात, ‘धन, दारा, पुत्र, बंधू, सोयरे हे सगळे मिथ्या आहे. मी – माझे हे माया विघ्न आहे. आयुष्य जाते आहे, आता तरी स्वहिताची चिंता करा. क्षणोक्षणी नाम स्मरा. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, भवकामाला न भुलता हरीभक्ती चुकवू नका. पहाटेचा एक अर्थ असा आहे की चौऱयांशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर मिळालेला नरदेह ही जन्मपहाट आहे. संत नामदेव महाराजांनी म्हटलं आहे, ‘गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत’ नरदेह आहे तोपर्यंत परमेश्वराची भक्ती करावी, ही जाण आहे. शिवसूत्र म्हणते, जागृतावस्थेत जगा आणि जागृतावस्थेत मरा. ज्याक्षणी मनुष्यजन्माचे रहस्य उमगते त्याक्षणी माणसाच्या आयुष्यामध्ये पहाट उगवते. पुन्हा काळझोप येऊ नये म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा हेच खरे!
सकाळ सुंदर होते ती सूर्योदयामुळे. सूर्य हा विश्वाचा आत्मा आहे. तो उगवण्यापूर्वी सडा-सारवण, पाणी भरणं, दळण दळणं अशी कष्टाची कामे करून, स्नान करून प्रसन्न मनाने स्त्रिया त्याच्या स्वागताला सिद्ध होत. पूजनीय डोंगरे महाराज म्हणत की, विजेच्या बिलासारखे सूर्यनारायण तुमच्याकडे दर महिन्याला बिल पाठवत नाही हे तुम्ही तुमचे नशीब समजा. सूर्यनारायणाचे दर्शन म्हणजे सामान्य माणसाच्या चर्मचक्षूंना होणारे प्रत्यक्ष परमात्म्याचे रूपदर्शन आहे. योगेश्वर याज्ञवल्क ऋषींनी सूर्यकवच हे स्तोत्र रचले आहे. आयुष्यात घडलेल्या एका अप्रिय घटनेमुळे याज्ञवल्क ऋषींना जन्मभर परिश्रम करून मिळवलेली विद्या ओकून टाकावी लागली. त्यामुळे त्यांचे अंतःकरण शून्य झाले. ते हताश, निस्तेज झाले. त्यांची वाणी मूक झाली. परंतु ही निराशा काही काळ टिकली. थोडय़ाच दिवसात ही निराशा झटकून टाकत त्यांनी विद्येची आराधना केली. त्यासाठी त्यांचे दैवत होते प्रत्यक्ष सूर्यनारायण. याज्ञवल्क्मयाच्या उपासनेमुळे सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी याज्ञवल्क्मयाला ज्ञान दिले. हे ज्ञान सर्वांसाठी शब्दांकित कसे करायचे हा प्रश्न पडला असता सूर्य भगवान याज्ञवल्क्मयाला म्हणाले, यासाठी तू देवी सरस्वतीची उपासना कर. याज्ञवल्क्मयाने तसे करताच सरस्वतीने त्यांना आशीर्वाद दिला. सूर्याने दिलेले ज्ञान आणि देवी सरस्वतीने प्रदान केलेले शब्द घेऊन त्यांनी ‘शुक्ल यजुर्वेद’ हा स्वतंत्र शुद्ध वेद निर्माण केला. याज्ञवल्क्मय मुनींनी रचलेले सूर्यकवच अतिशय प्रभावी आहे. त्यात म्हटले आहे की, ‘कंठं मे सुरवंदितः ’ वाचा ही सूर्यामुळे प्रभाव पावते आणि विस्तारते असा सिद्धांत आहे. उच्चारलेल्या प्रत्येक अक्षरात तेज असते. थंडीत, पावसाळय़ात आपला घसा बसतो. कारण सूर्यतेज कमी पडते. रोज सकाळी हे सूर्यकवच धारण केल्याने सूर्याचे तेज प्राप्त होते.
पृथ्वीला, आपल्या हातांना, सूर्याला, तुळशीला, शेतकऱयाला रोज सकाळी वंदन करावे. ही कृतज्ञता मानवी जीवनामध्ये आनंद पसरवत जाते हे नक्की.
स्नेहा शिनखेडे