नवी दिल्ली /प्रतिनिधी
अनेक दिवसापासून चर्चा सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी झाला आहे. ४३ मंत्र्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आजपासूनच पंतप्रधान मोदी यांनी नवीन मंत्र्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी मोदींनी मंत्रीमंडळातील नवीन सहकाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये मोदींनी प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका आणि १५ ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच राहण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज जवळजवळ सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून मोदींनी या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचं काम समजून घ्यावं असं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचं कामकाज लवकर सुरु करावं अशा सुचना नवीन सहकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्लाही मोदींनी या नवीन मंत्र्यांना दिल्याचं समजतं.