- भारतासाठी जिंकला होता पहिला ऑस्कर पुरस्कार
ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय लोकप्रिय कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे गुरुवारी निधन झाले. भानू अथैया यांनी भारतासाठी पहिला अकादमी म्हणजेच ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. वयाच्या 91 व्या वर्षी भानू यांनी मुंबईतील राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. भानू अथैया यांची मुलगी राधिका यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. प्रदीर्घ आजाराने त्यांचे आज सकाळी झोपेतच त्यांचे निधन झाले.
राधिका यांनी सांगितले की, भानू अथैया यांना हलका ताप आणि खोकला होता तसेच त्यांना एक प्रकारच्या न्यूमोनियाने देखील ग्रासले होते. भानू यांच्या निधनाने अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
भानू अथैया यांनी अनेक पिक्चरसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. रिचर्ड एटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपटासाठी भानु अथैया यांना 1982 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कॉस्च्युम डिझायनर म्हणून 100 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे.
भानु अथैया यांचा जन्म 28 एप्रिल 1929 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय आहे. 1952 मध्ये गुरुदत्त यांचा चित्रपट ‘सीआयडी’मध्ये कॉस्च्युम डिझाईनर म्हणून त्यांनी पहिल्यांदा काम केले. या काळात त्यांनी प्यासा, साहब बिवी और गुलाम, हेरा फेरी आणि श्री नटवरलाल अशा चित्रपटांसाठी काम केले.
1983 मध्ये ‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्कर जिंकण्याबरोबरच, भानु अथैया यांना ऑस्करमध्ये नामांकित होणार्या विविध चित्रपटांना मत देण्याचे अधिकारही मिळाले. त्यानंतर त्यांनी राम तेरी गंगा मैली, हीरो हिरालाल, अग्निपथ, चांदनी, लगान आणि स्वदेश यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी काम केले. 1991 मध्ये गुलजार दिग्दर्शित ‘लेकीन’ या चित्रपटासाठी आणि 2003 मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ या चित्रपटासाठी भानु अथैया यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.