गौरी आवळे/ सातारा
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च मध्ये लॉकडाऊन करण्यात आले. लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमाबाबत शासनाने नियम घातले. यांचा मोठा फटका प्रिंटिग व्यवसायाला बसला आहे. अनेकांचा उद्निर्वाह लग्न पत्रिका, कार्ड छपाईवर असल्याने आणि दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना संकटामुळे सध्या विवाह समारंभ बंद असल्याने लगीन घाई थांबली आहे. या पार्श्वभूमीवर काहीनी ऑनलाईन लग्न पद्धती स्वीकारली. तर काहींनी मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने लग्न पार पाडली. दरवर्षी लग्न समारंभासाठी कार्डची छपाई केली जाते. नवीन डिझाईन, स्टाईलची कार्ड लोकांना आकर्षित करत असतात. साताऱयात अंदाजे दीड ते दोन हजार पेक्षा जास्त प्रिंटिग प्रेस असून लगीन घाई वर अवलबूंन असणाऱया छपाई व्यवसायाला सुमारे 200 कोटीचा फटका बसला आहे. व्यवसायावर अंवलबून असणारे हजारो कामगार बेकार झाले आहेत. रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न समारंभाच्या पत्रिका, विविध कार्यक्रमाच्या पत्रिका, विविध कार्यक्रमांचे बर्नर, विझिटींग कार्ड, दवाखान्याची फाईल, शाळेचे ऍडमिशन फॉर्म, माहिती पत्रक, विविध जाहिराती करणारे दुकानाचे पॅपलेट्स आणि छपाईची सर्व कामे सध्या बंद आहेत.
लोकांना माहिती होण्यासाठी, कार्यक्रमांना गर्दी होण्यासाठी प्रिटिंग केलेला कागदच वापरला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणे धोक्याचे असल्याने नागरिक स्वत: कुठलीच जोखीम घेत नाहीत. यामुळे निमंत्रण पत्रिका काढल्या जात नसल्याने प्रिटिंग व्यावसायिकांना मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत. आर्थिक टंचाई निर्माण झाल्याने छपाई करणे लोकांना परवडणारे नाही. यामुळे छपाई व्यवसायाला येणार काळ कठीण आहे.