सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांचा दावा : मेळावलीत आयआयटी हे मुख्यमंत्र्यांचे सेटिंग : सांगे आयआयटीची घोषणा पर्रीकरांनी केली होती
प्रतिनिधी / पणजी
आयआयटी सांगेत यावी यासाठी मी ’सेटिंग’ आणि ’डील’ करत होतो, तर आता तीच आयआयटी मेळावलीतच व्हावी म्हणून हट्टाला पेटलेले मुख्यमंत्रीही सेटिंग व डीलच करत आहेत, असे आपण ठामपणे सांगू शकतो, असे सडेतोड उत्तर सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळेच ’प्रॉपर्टी सावंत’ म्हणून मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टीका ही त्यांची बदनामी नव्हे तर ते सत्य आहे, असा दावाही गावकर यांनी केला आहे. याच मुद्यावरून व्यथित होऊन आपण सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याचे त्यांनी काल बुधवारी जाहीर केले.
आयआयटीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोवा भाजपचे सरचिटणीस दामू नाईक आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गावकर बोलत होते.
या जमीन प्रकरणात आपण कोणत्याही प्रकारे गुंतलो असल्याचे दिसून आल्यास आपली खुशाल चौकशी करावी, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे
मुख्यमंत्रीपदासारख्या पवित्र जागेवर बसलेली व्यक्ती असे बेजबाबदार वक्तव्य करते, एकाद्याची बदनामी करते, आरोप करते, हे त्या पदाला अशोभनीय आहे. वापरा आणि फेकून द्या हीच भाजपची वृत्ती आहे. काँग्रेसचे ’दहाजण’ आले नव्हते तो पर्यंत या सरकारला माझी गरज होती. आता नाही. त्यामुळेच असे आरोप आपल्यावर करण्यात येत आहेत. अशा सरकारला पाठिंबा दिला याचे दुःख होते, असे अत्यंत उद्विग्न मनःस्थितीत गावकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी देव श्रीपाईक देवस्थानात प्रमाण व्हावे
एखाद्या सरकारी जमिनीचे डील करून कमिशन मिळवता येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी सेटिंग करूनच मेळावलीतील जमिनीचे आयआयटीसाठी डील करून भरभक्कम कमिशन मिळविले असावे, हेच सिद्ध होते, असा आरोप गावकर यांनी केला. हा आरोप खोटा ठरवायचा असेल तसेच आपणावर केलेले आरोपही सिद्ध करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगेतील अत्यंत जागृत देव श्रीपाईक देवस्थानात येऊन प्रमाण व्हावे, असे आव्हानही गावकर यांनी दिले.
दामू नाईक, रमेश तवडकर यांची पोपटपंची
भाजप पदाधिकारी दामू नाईक व रमेश तवडकर यांनी केलेल्या आरोपांबद्दल बोलताना, ते दोघेही पोपटपंची करत असून स्वतःचे अस्तित्व हरवून बसले आहेत, असे ते म्हणाले. दामू नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतःच्या मतदारसंघात किती विकास केला, किती प्रकल्प आणले ते सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
सांगेत आयआटीची पर्रीकर यांनीच केली होती घोषणा
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी असताना माझ्या वाढदिनी सांगेत आले होते. त्यावेळी ’आयआयटी सांगेत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यासाठी नंतर तेथील तीन जागाही दाखविल्या होत्या. पैकी पहिली कोटार्लीत होती. सुमारे 90 हेक्टर पैकी त्यातील 70 टक्के सरकारी होती. दुसरी कोयणामळ रिवण येथे होती. ती सुमारे 500 हेक्टर असून 100 टक्के सरकारी मालकीची होती. त्यातील 200 हेक्टर आयआयटीसाठी वापरता आली असती. ही जमीन संपूर्ण पठार असून तेथे कोणताही वनसंहार न करता व पर्यायाने नुकसानीही न करता प्रकल्प उभा राहिला असता. तिसरी जमीन उगे येथील सोशियादाद संस्थेची हेती, असे सांगून गावकर यांनी तिन्ही जागांचे नकाशे आणि संपूर्ण माहिती पत्रकारांसमोर सादर केली.
एवढे असूनही सरकारला मेळावलीतीलच जागा निवडण्याची एवढी घाई झाली होती की, सांगेतील प्रक्रिया करणे वेळकाढूपणाचे ठरेल असे स्वतःच ठरवून ती स्थगित ठेवत मेळावलीतील जागा निश्चित करण्यात आली. या जागेत घनदाट जंगल असून असंख्य झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्याशिवाय त्या जागेत प्रवेश करण्यासाठी तब्बल तीन कि. मी. अंतर आत जावे लागणार आहे. त्या जागेत असंख्य गावकऱयांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे मोठा विरोध होत आहे. तरीही त्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री तेथेच ती स्थापन करण्यावर ठाम आहेत. हा सर्व प्रकार पाहता, हे डिलिंगच असल्याचे सिद्ध होत आहे, असे गावकर म्हणाले.
मेळावलीतील लोकांना पाठिंबा देणार
दरम्यान, शेळ मेळावलीतील लोकांनी आयआयटी प्रकल्पास जोरदार विरोध दर्शवला आहे. कोणत्याही परिस्थितीत तो प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत तेथील लोकांनी सहकार्य मागितल्यास आपण अवश्य त्यांच्या मदतीसाठी जाणार असल्याचे श्री. गावकर यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना जाहीर केले. मेळावलीतील लोक हे गरीब, दुर्बल घटकातील आहेत. त्यांना पाठिंब्याची गरज आहे. तो पाठिंबा आपण त्यांना देणार, असे ते पुढे म्हणाले.
ऊस उत्पादकांना संपविण्याचा डाव
संजीवनीबद्दल बोलताना, हा कारखाना नफ्यात आणण्यासाठी आम्ही काही प्रस्ताव दिले होते, परंतु सरकारने ते धुडकावून लावले. विद्यमान कारखान्यातच 2 लाख टन ऊस गाळप झाल्यास तो नफ्यात येऊ शकतो, असे सांगितले होते. परंतु या सरकारला तो कारखाना पूर्ण मोडित काढून तेथे नवीन कारखाना उभारावयाचा आहे. त्यामुळे आपले कोणतेच म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले नाही. तसेच तेथेही मी ’सेटिंग’ व ’डील’ करतो असे आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात कोण सेटिंग करतो हे गोमंतकीय ओळखून आहेत, असे गावकर म्हणाले. पाच वर्षे किंवा मुख्यमंत्री म्हणतात त्या प्रमाणे तीन वर्षांत सुद्धा हा कारखाना बांधून झाला तरी त्या काळात ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार, असेही गावकर म्हणाले.
सावंत सरकारचा पाठिंबा काढला : गावकर
मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच आपण सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर प्रमोद सावंत यांचे सरकार सत्तेवर आले, तेव्हाही आपण पाठिंबा कायम ठेवला. सरकारकडे बहुमत नव्हते तोपर्यंत आपली गरज होती. मात्र नंतर आयात केलेल्या दहा आमदारांचा भरभक्कम पाठिंबा मिळवत त्यांना महत्वाची मंत्रीपदेही बहाल करण्यात आली. त्यामुळे आम्ही होतो तेथेच राहिलो व सध्या सरकारसाठी जड होऊ लागलो. त्यामुळेच स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच बेजबाबदार आरोप करून आपली बदनामी चालविली आहे. परंतु माझे मतदार सुज्ञ आहेत. वापरा व फेकून द्या या वृत्तीच्या या सरकारात राहिल्यास व त्यांची धोरणे घेऊन राहिल्यास पुढील उद्धार होणार नाही. सांगेतील माझ्या मतदारांचा स्वाभिमान मी विकू देणार नाही. त्यामुळेच या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याचे श्री. गावकर यांनी जाहीर केले. त्यासंबंधीचे पत्र नंतर त्यांनी राज्यपालांना सादर केले आहे.
वापरा व फेकून द्या ही वृत्ती भाजपला एवढी महाग पडेल की येत्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल. त्यातून सिंगल डिजीटवर त्यांना समाधान मानावे लागेल.