लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी दिला आपल्या आठवणींना उजाळा
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
`नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’, `फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ` या लावण्यांचे बोल कानी पडताच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ठसकेबाज आवाजात लावण्यांना आजरामर करून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवले. 6 दशकाहून अधिक काळ गाणाऱ्या सुलोचना या एकमेव लावणी गायिका ठरल्या आहेत. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी तब्बल दोन हजारहून अधिक लावण्या म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला डोलवले. `पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, `अन् तुझ्या उसाला लागल कोल्हा’, या दोन लावण्या आजही रसिक प्रेक्षक गुणगुणत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत लावणी सम्राज्ञी म्हणून नावारूपाला आलेल्या सुलोचना चव्हाण आज शनिवार 13 मार्च रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
सुलोचना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तरूण भारतने त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कलेवर प्रकाश टाकला. ठसकेबाज आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱया लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या कार्यक्रमाला मूहमांगी किंमत मिळाली असती पण त्यांनी आपला आवाज शाळा, कॉलेज, दवाखाणे, आनाथाश्रमातील गरजूंसाठी खर्ची केला. पैसा, पुरस्काराच्या मागे न धावता त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. सध्या त्या कोणाशी बोलत नसल्या तरी त्यांची कला त्यांना जगण्याची उमेद देते. त्यांच्या आवाजातील ठसकेबाजपणा 89 वर्षीही जशाच्या तसा आहे.
लहानपणापासून मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, बालनाटकातून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवत कला क्षेत्रात पाऊल ठेवले. स्वत:च्या श्रीकृष्ण बाळमेळ्यात गायन करीत होत्या. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या आग्रहास्तव `रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनी गायली. `नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची” या गाण्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. लावणीनंतरच आचार्य अत्रे यांनी त्यांना लावणी सम्राज्ञी किताब बहाल केला. लावणीच्या मुखड्याची सुरूवात ठसकेबाज करीत आपल्या सुरांनी त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत होत्या.
त्यांनी गायलेल्या `कसं काय पाटील बरं हाय का’, `खेळतांना रंग बाई होळीचा’, `पाडाला पिकलाय आंबा’, `फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, `सोळावं वरिस धोक्याचं’ यासह अनेक लावण्या आजही लोकप्रिय असून, या लावण्यांवर नृत्य सादरीकरणही केले जात आहे. कित्येक कार्यक्रमात या लावण्यांना विशेष स्थान दिले जात आहे. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर सादर होणाऱ्या लावणीला त्यांच्या नखरेल, ठसकेबाज आवाजाची जोड असायची. त्यामुळे महाराष्ट्रातील लावणी फुलली, बहरली. त्यांच्या लावणीचे बोल कानावर पडले की तरूणाईचे पाय थिरकल्याशिवाय राहात नाहीत.
सामाजिक कार्यात भरीव योगदान
सुलोचना चव्हाण लिखित `माझ गाण, माझ जगण’ या पुस्तकातून त्यांच्या सामाजिक कार्याची प्रचिती येते. तरीही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची कधीही उघडपणे चर्चा केली नाही. लावणी विश्वास त्यांनी नाव जरी मिळवले असले तरी आपल्या सामाजिक कार्यातून केलेल्या मदतीची कधीही वाच्यता होवू नये असे त्यांचे प्रांजळ मत आहे. यातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यांनी आपल्या आवाजाने लोकांची मने प्रफुल्लीत केलीच पण पिडीतांचे आश्रुदेखील पुसण्याचे बहुमोल कार्य केले. तरीही महाराष्ट्र शासनाने त्यांचा कार्याची दखल घशवून पद्मश्री पुरस्कार दिला नाही. वास्तविक त्यांनी गायन क्षेत्रासाठी दिलेले योगदान पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव करणे अपेक्षित आहे.
गाण्याशिवाय जीवन नाही
कोणतेही प्रशिक्षण नसताना मी सर्व भाषेतील मी गाणी गायली. 60 वर्षे गायन क्षेत्रात कार्यरत होते. आता वय झाले असले तरी गाण्याशिवाय जीवनात आनंद नाही असेच मला सध्याही वाटत आहे. सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज 90 व्या वर्षापर्यंत मी आरोग्यदायी जीवन जगले आहे.
लावणी सम्राज्ञणी (सुलोचना चव्हाण)