महाराष्ट्र-उत्तर प्रदेश ‘एटीएस’ची संयुक्त कारवाई, नेपाळमध्ये पलायनाचा डाव उधळला
वृत्तसंस्था/ कानपूर
राजस्थानमधील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी व देशभरात झालेल्या तब्बल 50 बॉम्बस्फोट सहभागी असणारा दहशतवादी मोहम्मद जलीस अन्सारी ऊर्फ डॉ बॉम्ब (वय 68) याला कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. नुकतीच त्याची पॅरोलवर (कैद्याची संचित रजा) सुटका झाली होती. ती संपण्याच्या एक दिवस आधी तो फरार झाला होता. तो नेपाळमध्ये पलायनाच्या तयारीत असताना महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने संयुक्तपणे त्याला अटक केली, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी शुक्रवारी दिली.
अन्सारी याला राजस्थानमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेप झाली आहे. तो अजमेर कारागृहात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी 17 जानेवारीपर्यंत 21 दिवसांसाठी त्याची पॅरोलवर सुटका झाली होती. मुंबईतील मोमीनपूरा परिसरात तो मुलाकडे राहत होता. या काळात त्याने मुंबईतील अग्रीपाडा पोलीस ठाण्यात दररोज सकाळी साडेदहा ते 12 वाजेपर्यंत हजेरी लावण्याचे आदेश होते. अन्सारी गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी आला नाही. दुपारी त्याचा मुलगा जैद अन्सारी हा पोलीस ठाण्यात आला. त्याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई
गुरुवारीच अन्सारीने मुंबईतून पलायन केले. तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत होता. कानपूरमधील फतेहगंज परिसरातील मशिदीमधून बाहेर पडून रेल्वे स्थानककडे जात असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे 47 हजार 780 रुपयांची रोकड, डायरी, मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सचे अधिकारी त्याची चौकशी करणार असल्याचे ओ. पी. सिंह यांनी स्पष्ट केले.
तब्बल 50 बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग
1993 मध्ये मुंबई व राजस्थानमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अन्सारीला सीबीआयने अटक केली होती. चौकशीत देशभरात वेगवेगळय़ा 50 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ‘सिमी’ आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही तो देत होता. त्यामुळेच एमबीबीएस पदवी घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱया अन्सारीला दहशतवादी संघटनांमध्ये ‘डॉ बॉम्ब’ नावानेही ओळखले जाते. मुंबईत 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याची चौकशी केली होती.