खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य संकटात
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली असताना खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या खाद्य तेलाचा चटका सहन करावा लागणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच खाद्य तेलाच्या दरात किलो मागे दहा रुपयांनी वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
रशिया-युपेन युद्धावेळी खाद्यतेलाचे दर भडकले होते. दरम्यान खाद्य तेलाचा दर 200 रुपये किलो झाला होता. त्यानंतर काही प्रमाणात खाद्य तेलाचे दर कमी झाले होते. 150 ते 160 रूपये किलो असणारे खाद्य तेल आता पुन्हा वाढले आहे. त्यामुळे वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे दिवाळीतील फराळावर परिणाम होणार आहे.
तेल दर वाढले, गृहिणी संकटात
दिवाळीत वेगवेगळा फराळ तयार करण्याला पसंती दिली जाते. मात्र खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणी संकटात सापडली आहे. त्याबरोबर हॉटेल, मेस, आणि इतर खाद्य व्यावसायिकांसमोर देखील संकट निर्माण झाले आहे. आधीच इंधन, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य अडचणीत सापडले आहेत. त्यातच खाद्य तेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच तेलाच्या किमतीत वाढ
धान्य, डाळी आणि पालेभाज्यांच्या किंमती देखील भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर काय खावे हाच प्रश्न पडला आहे. डाळी सर्रास 100 रुपये किलोच्या पुढे गेल्या आहेत. शिवाय पालेभाज्या देखील 60 रुपये किलोच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांसमोर चिंता वाढली आहे.