प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी नियमित पाणी पुरवठा होत असे. पण आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून अशातही गोकाक रोडवर बांधण्यात येत असलेल्या पुलाजवळ सातत्याने जलवाहिनी फुटल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे येथील समस्यांचे कायमस्वरुपी निवारण करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
हिडकल जलाशयातून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी हिडकल जलवाहिनीद्वारे कणबर्गी परिसराला थेट पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र बसवणकोळ जलशुद्धीकरण केंद्र सुरु झाल्यानंतर कणबर्गी परिसराला पाच दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पण हा पाणी पुरवठा देखील सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असतानाच गळतीमुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
गोकाक रोडवर नवीन पुलाची बांधणी करण्यात येत आहे. त्या ठिकाणी असलेल्या जलवाहिनीचे नुकसान झाल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला होता. पुलाची उभारणी करणाऱया कंत्राटदाराने जलवाहिनीची दुरूस्ती केली होती. पण हे काम व्यवस्थित न झाल्याने पुन्हा जलवाहिनी फुटली. याच ठिकाणी सांडपाणी वाहत असून जलवाहिनीमध्ये ते मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. एकतर पाणीपुरवठय़ात व्यत्यय आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे कायमस्वरुपी निवारण करावे, अशी मागणी होत आहे.