कोणे एके काळी पोस्ट ऑफीसमधले वातावरण अतिशय धीरगंभीर होते. पोस्टातल्या त्या तीनचार उंच खिडक्मया, खिडक्मयांच्या पलीकडे बसलेली ती खिन्न माणसे, अशक्त बल्बचा क्षीण पिवळसर प्रकाश, आत एखाद्या टेबलवर पत्रांवर शिक्के मारत बसलेला कर्मचारी, त्याचा तो ठप्प ठप्प आवाज हीच काय तिथल्या जिवंतपणाची निशाणी होती. दहा पैसे किमतीचे पोस्टकार्ड किंवा पावतीचे तिकीट घेण्यासाठी रुपयाची नोट पुढे केल्यावर वसकन ओरडणारा रोखपाल… सरकारी बँका किंचित प्रसन्न होत्या. तिथले पगार जरा बरे होते. बँकेत कारकून म्हणून लागलेल्या तरुणाला त्याच्या पोटजातीतली श्रीमंताघरची मुलगी सांगून यायची. ते सत्तरचे दशक होते. बँकेत क्वचित मुली देखील भरती झालेल्या दिसत.
बघता बघता चित्र बदलले. पोस्टातले पगार बहुधा वाढले. तिथल्या भिंतींना नवे रंग चढले. स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट वगैरे गोष्टी संगणकावर होऊ लागल्या. खिडकीमागची माणसे स्मित करायला शिकली. बँकेत पुरुष आणि महिला कर्मचाऱयांची संख्या समान झाली आणि काही दिवसांनी पुरुष कमी झाले. बँकेतल्या लोकांचे पगार कमी झाले नाहीत. पण त्यांच्या चेहऱयांवरची स्मितहास्ये कमी होत गेली. कपाळावर आठय़ा दिसू लागल्या. बँकेत संगणक आले. पण कामे कमी झाली नाहीत. देशभरातल्या पेन्शनर्सची खाती बँकेत आली. वेगवेगळय़ा सरकारी योजना राबवण्याच्या जबाबदाऱया आल्या. बँकांमधली खाती वाढत गेली आणि कर्मचारी कमी होत गेले. उरलेले चिडखोर होत गेले.
त्याच वेळी खाजगी बँकांमध्ये तुफानी पगार घेऊन चटपटीत चुणचुणीत मुले-मुली नोकरी करू लागली. घरोघर हिंडून खातेदार जमवू लागली. स्मितहास्य करून गळय़ात पडून कर्ज घ्यायला लावू लागली. लोक तिथे ठेवी ठेवू लागले. सरकारी बँकांच्या नावाने बोटे मोडण्याची फॅशन आली. आणि मग एकेका खाजगी बँकेतले घोटाळे बाहेर येऊ लागले. खातेदारांच्या ठेवी अडकून पडू लागल्या. बुडू लागल्या.
आर के लक्ष्मण यांचे एक व्यंगचित्र आठवते. त्यात दोन मुख्यमंत्र्यांचे चेहरे दाखवून भाष्य केले होते. हा स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही, तो कार्यक्षम आहे पण प्रामाणिक नाही.
सरकारी आणि खाजगी बँकांचा विचार करताना असेच म्हणावेसे वाटते. पैसे बुडणार नाहीत अशी किंचित अकार्यक्षम सरकारी बँक हवी की जिथे पैसे बुडण्याची भीती आहे.
अशी चकाचक खाजगी बँक हवी?