ममता बॅनर्जींची भाजपवर टीका
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आता जवळ येत चालला असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रचारक जीव तोडून प्रचार करीत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांभाळली असून त्यांनी शुक्रवारी पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ात दोन जाहीर सभा घेतल्या. भाजप मतदारांना पैसे वाटून आपल्याकडे आकर्षित करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या अस्मितेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. बाहेरून आलेले दुर्योधन आणि दुःशासन राज्याला नको आहेत. राज्याचा आपल्या नेत्यांवर विश्वास असून तृणमूल काँग्रेसच पश्चिम बंगालच्या संस्कृतीचे आणि शांततेचे संरक्षण करू शकेल, असा दावा त्यांनी केला. पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांवरही त्यांनी टीकेची झोड उठविली.
सुवेंदू अधिकारींवर टीका
सुवेंदू अधिकारी यांच्यावर आपण आंधळा विश्वास टाकला. तथापि, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. ते पक्षाशी एकनि÷ राहतील, अशी आपली समजूत होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी घात करून भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सीपीएम आणि काँग्रेसही धारेवर
ममता बॅनर्जी यांनी भाजपप्रमाणेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीलाही धारेवर धरले. तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडून ही युती भाजपलाच साहाय्य करीत आहे. भाजप आणि सीपीएम-काँग्रेस आघाडी यांच्यात आतून संगनमत झाले असून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सावध रहावे, असा इशारा त्यांनी दिला.
निवडणूक आयोगावर नाराजी
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले असल्यासारखा वागत आहे. त्यामुळे राज्यात मुक्त वातावरणात निवडणूक होईल की नाही, याची शंका आहे, अशी टीका नुकतेच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. गुरुवारी यशवंत सिन्हा आणि तृणमूलच्या काही नेत्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेऊन आयोगाविरुद्ध आयोगाकडेच तक्रार केली. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळले असून आपली बदनामी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.