वार्ताहर / जैतापूर
राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयात 6 वीच्या वर्गात प्रवेशासाठी परजिल्हय़ातील काही मंडळी आपल्या पाल्यांचा रत्नागिरी जिल्हय़ातील शाळांमध्ये 5वीच्या वर्गात खोटा प्रवेश दाखवून नवोदयच्या प्रवेश परीक्षेला बसवत असल्याचे गतवर्षी भाजपा पदाधिकाऱयांनी उघड केले होते. आता नववी प्रवेशासाठीही अशाच प्रकारे परजिल्हय़ातील पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश परीक्षेला बसवल्याचा प्रकार भाजपाचे राजापूर तालुका अध्यक्ष अभिजित गुरव आणि त्यांच्या सहकाऱयांनी उघड केला आहे.
नववी प्रवेशसाठी बुधवारी नवोदय विद्यालयात झालेल्या परीक्षेला अशा प्रकारे परजिल्हय़ातील 6 विद्यार्थी रत्नागिरी जिल्हय़ातील काही शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखवून परीक्षेला बसल्याचे पुढे आले आहे. तशी माहिती गुरव यांनी पत्रकारांना दिली. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अशा प्रकारे वारंवार होणाऱया या बोगस प्रवेशाचा आधार घेत जिल्हय़ातील मुलांना नवोदय विद्यालयापासून वंचित ठेवणाऱया या जिह्यातील शाळा व त्यांचे पालक यांच्यावर नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा कारवाई करणार का, असा सवाल आता गुरव यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारे जिल्हय़ातील शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखवण्यामागे पारजिल्हय़ातील काही शिक्षण ऍकॅडमींचा सहभाग असून पालकांकडून 40 ते 50 हजार रूपये घेऊन या ऍकॅडमी रत्नागिरी जिल्हय़ातील शाळांमध्ये परजिल्हय़ातील विद्यार्थ्यांचा पाचवीत व आठवीत प्रवेश दाखवून पालकांचीही व विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. यामुळे जिल्हय़ातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून आमच्या तालुक्यातील नवोदय विद्यालयाचीही बदनामी होत असल्याचे गुरव यांनी सांगितले.
गतवर्षी अशाच प्रकारे जिल्हय़ातील काही शाळांमध्ये पाचवीत बोगस प्रवेश दाखवून नवोदय विद्यालयात सहावी प्रवेश परीक्षेसाठी परजिल्हय़ातील अनेक विद्यार्थ्यांना बसवले गेले होते. हा प्रकार अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उघड केला होता. त्यावेळी या प्रकरणी चौकशी करून कारवाईची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली होती. यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा असतानाच आता नवोदय विद्यालयात नववी प्रवेशासाठी झालेल्या प्रवेश परीक्षेतही तसाच प्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
बुधवारी आपण प्रत्यक्ष नवोदय विद्यालयात जाऊन पाहणी केली असता अनेक गाडय़ा कोल्हापूर व अन्य जिल्हय़ातून आल्या होत्या, असे गुरव यांनी सांगितले. नववीच्या प्रवेशासाठी 144 विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी नवोदयमध्ये बसले होते. यामध्ये 6 विद्यार्थी परजिल्हय़ातील आढळून आल्याचे गुरव यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांशी आपण बोललो असता त्यांना त्यांच्या शाळेचे नावही सांगत येत नव्हते. अनेकांनी रत्नागिरी जिल्हय़ातील गुहागर, रत्नागिरी, पाली येथे आपण शाळेत असल्याचे सांगितले. तर काहींनी एका ऍकॅडमीत प्रवेश घेऊन आता या प्रवेश परीक्षेसाठी आल्याचे सांगितल्याचा दावा गुरव यांनी केला आहे.. ही शासनाची फसवणूक असून यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील स्थानिक मुलांवर अन्याय होत असल्याचे गुरव यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱयांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि बोगस प्रवेश देणाऱया व प्रवेश दाखवणाऱया शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. अशा प्रकारे पैसे घेऊन नवोदय प्रवेशासाठी जिल्हय़ातील शाळांमध्ये परजिल्हय़ातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱया ऍकॅडमीवाल्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या एकूणच प्रक्रियेत नवोदय विद्यालयाचा काहीही दोष नसल्याचे नमूद करत यामुळे नवोदय विद्यालयाची नाहक बदनामी होत असल्याचा मुद्दाही गुरव यांनी मांडला आहे.