वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात बलात्कार तसेच दंगलींच्या घटनांचे प्रमाण कमी झाल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल बुधवारी सांगितले आहे. गुन्हे नोंदणीच्या डिजिटायजेशनवर सरकार जोर देत असल्याचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात सांप्रदायिक दंगलींच्या संख्येत घट झाली आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांनी 2019 मध्ये अशाप्रकारचे 440 गुन्हे नोंदविले आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 512 इतका होता.
हत्यांचे प्रमाण कमी
देशात बलात्कार, हत्या आणि अपहरणाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे गृह मंत्रालयाने उत्तरादाखल सांगितले आहे. एनसीआरबीकडून 2019 या वर्षात देशात बलात्काराचे 32,033 तर हत्येचे 28,918 आणि अपहरणाचे 1,05,037 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा अनुक्रमे 33,356 तसेच 29,017 आणि 1,05,734 इतका होता.
गुन्हय़ांची डिजिटल आकडेवारी
देशात गुन्हेगारी आकडेवारीच्या डिजिटलायजेशनवर भर दिला जात आहे. क्राइम अँड क्रिमिनल ट्रकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्सवर आता एकूण 30.81 कोटी इतक्या गुन्हय़ांची आकडेवारी उपलब्ध असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
अवैध घुसखोरी
2018 ते 2020 या कालावधीत भारतात अवैध घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया 116 पाकिस्तानी, 2,812 बांगलादेशी आणि म्यानमारच्या 325 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
डिजिटल जनगणना होणार
देशात 2021 मध्ये होणारी जनगणना देशात पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. याकरता 8,754.23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
इंटरनेट बंदी
देशात कितीवेळा इंटरनेट बंद करण्यात आले याची माहिती नसल्याचे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे. दंगली किंवा तणावाच्या स्थितीत दूरसंचार सेवांना तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्याचा निर्णय राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी घेतात, असे म्हटले गेले आहे.