ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरत आहे. पाक लष्कर आणि इम्रान सरकारविरोधातील बलुच लोकांच्या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. ब्राबचाह भागात आंदोलकांनी आज जोरदार निदर्शने करत दगडफेक केल्याने घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याला चौक्या सोडून पळ काढावा लागला. बलुचिस्तानमध्ये लोकांनी सैन्याच्या वाहनांवर दगडफेक केली. तसेच सैन्याच्या इमारतीलाही आग लावली.
मागील 14 दिवसांपूर्वी बलुचिस्तान प्रांतातील तुरबत शहरात एक महिला आणि तिच्या 4 वर्षीय मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या आंदोलनाने वेगळे वळण घेतले. सत्ताधारी बलुचिस्तान आवमी पार्टीच्या सदस्यांनीच या महिलेची आणि मुलीची हत्या केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकारकडून सातत्याने लोकांवर अन्याय होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
बलुचिस्तानातील लोक अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहेत. लष्कराकडून स्थानिक लोकांवर होणारे अत्याचार आणि परिसरात विकासाचा अभाव यामुळे पाक सरकारविरोधात त्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात येथील गायब झालेल्या नागरिकांचा उल्लेखही करण्यात आला आहे. ब्रबाचह हा भाग किली नूर शाहच्या अखत्यारीत येतो. इथले लोक ही सीमारेषा मानत नाहीत. ते लोक या सरहद्दीला एकपक्षीय रेषा मानतात.